भाजपानं राज्यघटनेचा चोळामोळा करण्याचं पाप केले, राऊत यांचा आरोप

ब्युरो टीम : महाराष्ट्रातील सत्तानाट्यादरम्यान भाजपानं राज्यघटनेचा चोळामोळा करण्याचं पाप केल्याचा आरोप शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
'मी भाजपाला इशारा देतोय, की घोडेबाजारात तुम्ही किती हजार कोटींची उधळपट्टी केली, हे सर्वच लोकांना माहिती झालं आहे. अशा प्रकारे पैशांचा वारेमाप वापर करून शिवसेना संपवण्याचा विचार जर तुम्ही करत असाल, तर तुमचा विचार फोल ठरेल. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी तुम्ही विकत घेतले असतील. पण शिवसैनिक विकत घेण्याचा विचार तुम्ही कदापि करू नका. शिवसैनिक तुम्हाला गाडून टाकतील', असेही राऊत म्हणाले.
गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींनंतर आता सत्तेत आलेल्या  शिंदे-भाजपा युतीच्या सरकारचा शिवसेनेच्या नेत्यांनी समाचार घेण्यास सुरुवात केली आहे.  विनायक राऊत यांनीही  पत्रकार परिषदेत भाजपवर तोफ डागली आहे.
एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची हौस तात्पुरती भागल्याचा टोला विनायक राऊत यांनी लगावला आहे. 'हा भाजपाचा कुटिल डाव आहे. ज्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं, त्या एकनाथ शिंदेंची हौस तात्पुरती भागवली आहे. हे काही कायम स्वरूपी नाहीये. फक्त एकनाथ शिंदे किंवा त्यांच्यासोबत गेलेले इतर ३९ आमदार गेल्यामुळे शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचं जरी नुकसान झालं असलं, तरी शिवसेनेचा मूळ ढाचा कुठेही ढासळलेला नाही. महाराष्ट्रातले सर्व पदाधिकारी, जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख हे आजही तेवढ्याच ताकदीने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत खंबीरपणे उभे आहेत. महाराष्ट्रात एकट्या शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा निर्धार शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे व्यक्त करत आहेत', असं राऊत म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने