उद्धव ठाकरेंचा 'संकटमोचक' वेगळ्या विचारात?


ब्युरो टीम: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या अनेक दशकांपासून शिवसेनेत सक्रियपणे काम करत आहेत. त्यांचा पक्षातील ज्येष्ठ नेत्यांपासून ते ग्रामीण भागातील सामान्य कार्यकर्त्यांशीही चांगला संपर्क असल्याचं बोललं जातं. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात असले तरी त्यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबतही मैत्री आहे. त्यामुळे शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मिलिंद नार्वेकर हेदेखील उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर जाणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

उद्धव ठाकरेंचे गेल्या अनेक दशकांपासून विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्याबाबतही सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे. पक्षातील बंडखोरीमुळे शिवसेना सध्या ऐतिहासिक संकटात सापडली आहे. शिवसेनेत याआधीही अनेक दिग्गज नेत्यांनी बंड केलं आहे. मात्र यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या तब्बल ५५ पैकी ४० म्हणजे दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी बंड केल्याने पक्षनेतृत्वाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याद्वारे या संकटातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र अशातच उद्धव ठाकरे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण उद्धव यांचे गेल्या अनेक दशकांपासून विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर यांच्याबाबतही सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगू लागली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतील उभी फूट पडल्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर हे गेल्या काही दिवसांपासून फारसे सक्रिय नसल्याचं सांगितलं जात आहे. अशातच नुकतीच नार्वेकर यांची एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत विधिमंडळ परिसरात तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या चर्चेचा तपशील अद्याप समजू शकला नाही. मात्र शिंदे आणि ठाकरेंमध्ये राजकीय घमासान सुरू असताना मिलिंद नार्वेकरांनी श्रीकांत शिंदें यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने