उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ, केसरकर स्पष्टच बोलले

ब्युरो टीम : 'उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर आम्ही नक्की जाऊ,' असं विधान शिंदे गटातील बंडखोर आमदार आणि प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयातील कार्यालयात प्रवेश केला. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पूजेसाठी दीपक केसरकर यांनीदेखील हजेरी लावली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं. 'आजुबाजूच्या काही लोकांना उद्धव ठाकरेंनी दूर ठेवावं', असा सल्लाही त्यांनी दिला.
            उद्धव ठाकरेंनी परत बोलावलं तर तुमची काय भूमिका असेल असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, 'आम्ही आता भाजपासोबत सत्तेत आलो असून एक नवीन कुटुंब तयार झालं आहे. आता या कुटुंबामधून परत जायचं असेल तर आम्ही एकटे नाही. आम्हाला बोलावताना त्यांना भाजपाशीदेखील चर्चा करावी लागेल, आशीर्वाद द्यावा लागेल. दरम्यान, 'मातोश्रीवरून बोलावणे आले तर नक्की जाऊ, मात्र एकटे जाणार नाही. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे साहेबांना बोलावलं तरच आम्ही सर्व एकत्र मातोश्रीवर जाऊ,'  असे वक्तव्य शिंदे गटाचे नांदगावचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी कालच शिर्डी येथे बोलताना केले होते. त्यामुळे शिंदे गट व शिवसेना लवकरच एकत्र येणार का ? यावर चर्चा सुरू झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने