ब्युरो टीम: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत. या भेटीपूर्वी दोन्ही नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधला. एकनाथ शिंदे यांनी सदिच्छा भेटीसाठी दिल्लीत आलो असल्याचं सांगितलं. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सदिच्छा भेट घेत असतो, त्याप्रमाणं काल आणि आज दोन दिवस राष्ट्रपतींची भेट घेतली. गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन आशीर्वाद घेणार आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्याच्या विकासासाठी केंद्राचा आशीर्वाद महत्त्वाचा
एका विचारातून, हिंदुत्वाचा अजेंडा, बाळासाहेबांच्या भूमिकेतून या सर्व घडामोडी झाल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना भाजप युतीत निवडणुका लढवल्या आहेत. लोकांच्या मनामधील सत्ता, सर्वसामान्य लोकांच्या मनामधील सरकार अशी भूमिका घेऊन लोकांच्या मनात होतं त्याप्रमाणं सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळं वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला आम्ही आलो आहोत. राज्यात जे काय आम्ही सरकार स्थापन केलंय ते लोकांचं आहे, लोकांच्या हिताचं सरकार आहे. महाराष्ट्राच्या शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांना न्याय देणारं हे सरकार आहे. केंद्र सरकारची मदत आणि आशीर्वाद आवश्यक आहे. नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत, महाराष्ट्राच्या विकासाचं व्हिजन समजून घेणार आहोत. राज्याच्या विकासात केंद्राचा वाटा असतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
सरकार स्थापनेत देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं योगदान सरकार स्थापन करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांचे आशीर्वाद होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आशीर्वाद लाभले. गृहमंत्री अमित शाह यांचे आशीर्वाद आणि सहकार्य या सरकारच्या पाठिशी आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा हे सोबत होते. उपमुख्यमंत्री आणि पाच वर्ष यशस्वी मुख्यमंत्री म्हणून काम केलेल्या देवेंद्र फडणवीस यांचं या सरकारच्या स्थापनेत मोलाचं योगादान आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
केंद्राचं सहकार्य मिळतं ते राज्य वेगानं प्रगतीकडे जात असतं. त्यासाठी आम्ही सदिच्छा भेटी घेतल्या आहेत. काय झालं ते तुम्हाला माहिती आहे, राज्यात आणि देशात ज्या काही घडामोडी घडल्या आहेत, त्याची देशातील सर्वांनी आणि जगात देखील याची नोंद घेतलीय. पाच वर्ष देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात मोठं काम केलं, समृद्धी महामार्ग, मेट्रो, जलयुक्त शिवार हे सर्वांच्या लोकांच्या, शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत. महाराष्ट्राला गतवैभव आणि चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करु, असं एकनाथ शिंदे म्हणाले. आषाढी एकादशीनंतर राज्यातील खातेवाटपावर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि मी भेटून चर्चा करु असं एकनाथ शिंदे म्हणाले.
तुषार मेहता यांच्याकडे ओबीसी राजकीय आरक्षणासाठी गेलो होतो. ओबीसीचा मुद्दा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. लोकशाहीत आकड्यांना महत्व आहे. देशात राज्यात संविधान आहे. आम्ही नियमाच्या बाहेर जाऊन काम केलेलं नाही. मुंबईकर आणि महाराष्ट्राची जनता सूज्ञ आहे. कोण काय करतं हे जनतेला माहिती आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
नरेंद्र मोदींचं व्हिजन समजून घेणार-
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, विधानसभा अध्यक्ष पदाची निवड, विश्वासमत चाचणी झाल्यानंतर आम्ही दिल्लीला आलो आहे. पक्षाचे नेते, संविधानिक पदावरील महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, अमित शाह, राजनाथ सिंह, जे.पी.नड्डा यांची भेट घेतलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांचं व्हिजन समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. या दौऱ्याचा राजकीय अर्थ घेऊ नका, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा