राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना पत्र, म्हणाले...


ब्युरो टीम :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा राज्यात सुरु असणाऱ्या सततच्या पावासामुळे
पुढे ढकलण्यात आलाय. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच पत्र लिहून यासंदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. 
'सध्याची पावसाची स्थिती पाहता मी उद्या जो कार्यक्रम तुम्हाला सांगणार होतो, तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात आणता येणं फार अवघड आहे, 'असं राज यांनी पत्रात म्हटलंय.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन हे पत्र शेअर करण्यात आलं आहे. त्यात म्हंटले आहे, 'तुम्हाला जरा थोड्या तातडीनं कळवतो आहे. आपण वास्तविक उद्या एका मेळावा आयोजित केला होता. ज्यात मला तुमच्याशी बोलायचं होतं आणि कामासंबंधी काही सूचना करायच्या होत्या. परंतु कालपासून महाराष्ट्रात विविध ठिकाणी पावसानं थैमान घातलेलं दिसत आहे. जनजीवन विस्कळीत आहेच, परंतु अशा परिस्थितीत मी उद्या जो कार्यक्रम तुम्हाला सांगणार होतो तो सांगितला तरी तो प्रत्यक्षात  आणता येणं फार अवघड आहे.' पुढे बोलताना राज यांनी पत्रात म्हंटले आहे, 'अशा परिस्थितीत आपण उद्याचा मेळावा पुढे ढकलत आहोत. पुढची तारीख आणि वेळ लवकरच, थोडा वातावरणाचा अंदाज घेऊन, तुम्हा सर्वांना कळवली जाईलच. तुम्ही स्वत:ची तर काळजी घ्याच परंतु अतिवृष्टीमुळे जिथे लोकांना त्रास होतो आहे तिथेही तुम्ही लोकांसाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न करा. मुख्यत: नदीकाठाला जिथे लोक राहत आहेत तिथल्या घरांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता आहे. सांगली- कोल्हापूरकडचा आत्ता-आत्ताचा पूर तुम्हाला आठवतोय ना? काही लोकांना तात्पुरत्या निवासात हलवायला लागू शकतं. तिथे अन्नधान्य, पिण्याचं शुद्ध पाणी, अंथरुण-पांघरुण (सर्वत्र ओल असते) पुरवावं लागेल. मुख्यत: वृद्ध, गरोदर महिला, अपंग आणि लहान मुलं यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागेल. झाडं उन्मळून पडतात, ती नंतर पुन्हा लावावी लागतील, अशा खूप गोष्टी आहेत,'  अशी कामांची यादीच राज यांनी या पत्रात कार्यकर्त्यांना सांगत सामाजिक भान जपून या संकटाच्या प्रसंगी सामजासाठी कार्य करावं असं म्हटलंय.
'एक लक्षात घ्या की असा परिस्थितीत सरकारी यंत्रणा प्रचंड कामात असतात त्यामुळे त्यांच्यावर विनाकारण ताण येईल असं काहीही करु नका. अर्थात असं काही होऊ नये, कुठलंही नैसर्गिक संकट येऊ नये, हीच आपली इच्छा आहे, फक्त सतर्कतेसाठी सांगितलं,' असं राज यांनी पत्राच्या शेवटी म्हटलंय.
पत्राच्या शेवटी राज यांनी कार्यकर्त्यांना, ‘लवकरच भेटू’ असं सांगत मेळाव्याची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असे संकेत दिलेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने