आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना खुले आव्हान, निष्ठा यात्रेदरम्यान.काय म्हणाले...

 


ब्युरो टीम:
शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी आज रविवारी निष्ठा यात्रेच्या  अनुषंगाने बोरिवली, दहिसर, मागाठाणे येथील शाखांना भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आमदारांच्या बंडखोरीवर भावनिक प्रतिक्रिया देत निर्धार व्यक्त केला. 'स्वतःच्या राक्षसी महत्वाकांक्षेसाठी उद्धव साहेबांच्या आजारपणाचा फायदा घेतला. या लोकांनी चांगल्या लोकांना राजकारणात स्थान नसतं हे दाखवून दिलं. पण राजकारणात चांगल्या माणसांना देखील स्थान असतं हे मला दाखवून द्यायचं आहे', असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. 

           आदित्य ठाकरे यांनी आज बोरिवली येथील शाखा क्रमांक १२ ला भेट दिली. यावेळी त्यांनी मी दिसलो पाहिजे. नाही तर तुम्हाला वाटेल मी गुवाहाटीला गेलो, अशा शब्दात बंडखोरांना टोला हाणला. पुढे बोलताना त्यांनी, ज्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला, प्रेम आणि हवं ते सगळं दिलं त्यांनी आपला विश्वासघात केला, पाठीत खंजीर खुपसला, अशी खंत देखील व्यक्त केली.

          या शाखेचं उद्घाटन मीच केलं होतं. सत्तेतून पळून जाणं, हे पहिल्यांदाच दिसलं. स्वतः ला विकलं की कोणती फाईल होती माहीत नाही. मुळात फुटीरतावादी आणि गद्दारांवर मला बोलायचंच नाही आहे. तिथे गेलात. तिथे सुखी राहा, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी बोलताना थोडी लाज ठेवा, राजीनामे द्या, निवडणुकीला सामोरे जा, असं खुलं आव्हान देखील बंडखोर आमदारांना दिलं आहे. तसंच ज्यांना पळवलं गेलं आहे, ज्यांना फसवून नेलं आहे, त्यांच्यासाठी मातोश्रीची दार खुली आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

          मी १५ वर्षांपूर्वी बंड बघितलं. ते कुठे आहेत ते तुम्हाला माहिती आहे. मला तर माहीतही नाही. शिवसेनेचा इतिहास आहे; ज्यांनी ज्यांनी बंड केलं ते कधीही टिकले नाहीत, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना इशारा दिला.

         'फुटीरतावादी, गद्दार कसे असतात?, इथून सुरत, गुवाहाटी, झाडी, गोवा आणि मग सकाळी ६ वाजता सगळं ओक्के. बंड चुकीच्या गोष्टींच्या विरोधात होतं. इथे कारण नसताना, काही तरी कारणं दिली जात आहेत. स्वतःची राक्षसी महत्वकांक्षा बघून ही गद्दारी केली. उद्धव ठाकरे जेव्हा सर्जरीमध्ये होते तेव्हा तुम्ही सोडून गेलात. तेव्हा तुम्ही आमदारांची जमवाजमाव केली', अशी भावनिक प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली.

         डान्सचा व्हिडीओ बघून मला किळस आला. आसाममध्ये पूर आलेला असताना हे मज्जा करत होते. राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, ते त्यांनी दाखवून दिलं. राजकारण कमी केलं, हीच आमची चूक, असं आदित्य ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी उद्या सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवर बोलताना आमचा न्यापालिकेवर विश्वास असल्याचं म्हटलं.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने