फडणवीस यांनी सभागृहातच सांगितले मी राज ठाकरेंची भेट घेणार, कारणही तसच

ब्युरो टीम :राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीस यांना पत्र लिहून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. आज सभागृहामध्ये या पत्राचा फडणवीस यांनी उल्लेख केला. ते म्हणाले, , ‘मनसेचे नेते राज ठाकरे यांनी सुंदर पत्र लिहिलं. मी उत्तर देणार होतो. पण, त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाही. फोन करुन आभार मानले. मी राज ठाकरेंची भेटही घेणार आहे.’
देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या नावे एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये राज ठाकरे यांनी फडणवीसांचं खूप कौतुक केलं होतं. उपमुख्यमंत्रिपद स्विकारावं लागल्याने अनेकांनी फडणवीसांवर शेरेबाजी केली, काहींनी खिल्लीही उडवली. मात्र, याला बढती आहे की अवनती यात मी जात नाही, पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. ह्या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही!, असं म्हणत राज ठाकरेंनी फडणवीसांना धीर दिला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने