उद्धव ठाकरेंना सांगोल्यात बंगला भाड्याने घेऊन देतो -शहाजीबापू माझ्यावर काय लक्ष ठेवायचं आहे ते ठेवा आणि काय पाडायचं ते पाडा


   ब्युरो टीम:  राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील आरोप-प्रत्यारोप तीव्र होताना पाहायला मिळत आहेत. यादरम्यान आता पुन्हा एकदा शिंदे गटातील बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

      शहाजीबापू यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देत म्हटलं की, मी उद्धवसाहेब आणि आदित्यसाहेब यांना सांगोल्यात दोन बंगले भाड्याने घेऊन देतो. माझ्यावर काय लक्ष ठेवायचं आहे ते ठेवा आणि काय पाडायचं ते पाडा. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त वेळा पडायचा विक्रम माझ्या नावावर आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

      चंद्रकांत खैरे यांनी नुकताच दावा केला होता, की शिंदे गटातील 15-16 आमदार आमच्या संपर्कात आहेत. यावरही शहाजीबापूंनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की चंद्रकांत खैरे काहीही फेकाफेकी करतात. 10 आमदार की 15 तेच अजून नक्की नाही, आधी ते करावं आणि मग सांगा म्हणावं, असा टोला पाटील यांनी लगावला.

      दसरा मेळाव्याबद्दल बोलताना ते म्हणाले, की दसरा मेळावा एकनाथ शिंदे साहेबांनी घ्यावा अशी आमची मागणी आहे. कारण आमची शिवसेना खरी आहे, ती बाळासाहेबांच्या विचारावर चालणारी आहे. पुढे ते म्हणाले, की आम्हाला गद्दार तेच म्हणतात जे सकाळी मंत्रालयात जायचं म्हणून अंघोळीला गेले होते आणि बाहेर आल्यावर कळालं की आपलं मंत्रीपद गेलं.शिवसेनेनं 50 खोके घेतल्याच्या केलेल्या आरोपावर बोलताना शहाजीबापू म्हणाले, की कसले खोके आम्हाला डाळिंब भरायचं खोके तेवढे माहिती आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने