बारामती महाराष्ट्रातच आहे अन आमचे टार्गेट ४५+ खासदारांचे आहे; बारामतीची जागा जिंकरणार- देवेंद्र फडणवीस

ब्युरो टीम: राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यांत पुढील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बारामती दौऱ्यावर असून तिथे बोलताना बावनकुळेंनी भाजपाच्या ‘मिशन बारामती’चीही घोषणा केली. यावेळी बावनकुळेंनी पुढील सर्व निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा एकत्र लढणार असल्याचं देखील जाहीर करतानाच या युतीच्या माध्यमातून विधानसभेत २००हून जास्त तर लोकसभेत राज्यातून ४५हून जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. याच मिशन बारामतीसंदर्भात नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक शब्दांमध्ये उत्तर दिलं.

    बावनकुळेंनी बारामतीची लोकसभेची जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. “केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण पूर्णवेळ प्रभारी आहेत. पुढच्या १८ महिन्यांत निर्मला सीतारमण ५ ते ६ वेळा बारामती दौऱ्यावर येऊन प्रत्येक वेळी तीन दिवस मुक्कामी असणार आहेत. इथल्या विकासाची परिस्थिती काय आहे, केंद्राकडून विकासाबाबत काय अपेक्षा आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून काय करता येईल या दृष्टीने या दौऱ्यांमध्ये विचार करण्यात येईल”, असं बावनकुळे म्हणाले.

      नागपूर विमानतळावर दाखल झालेल्या फडणवीस यांनी विमानतळाबाहेर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बावनकुळेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी फढणवीस यांना प्रश्न विचारला. आज बावनकुळे बारामतीमध्ये आहेत. भाजपाचं मिशन बारामती काय आहे? असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी, “भाजपाचं मिशन इंडिया आहे. महाराष्ट्र भाजपाचं मिशन महाराष्ट्र आहे. बारामती महाराष्ट्रात येते त्यामुळे मिशन महाराष्ट्रामध्येच बारामती आहे,” असं सांगितलं. त्यानंतर पत्रकारांनी, भाजपाकडून बारामती लास्ट फ्रण्टीयर आहे का? असं विचारलं असता, “लास्ट फ्रण्टीयर वगैरे काही नसतं. आमच्याकडे प्रत्येक सीट महत्त्वाची आहे,” अशा शब्दांमध्ये फडणवीसांनी उत्तर दिलं.

         राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन भेट देणार आहेत. निर्मला सीतारामन संघटनात्मक बैठकांबरोबरच कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यांच्यानंतर भाजपाचे अन्य वरिष्ठ नेते बारामती दौरा करणार असल्याने भाजपाने बारामतीला दिलेले राजकीय महत्त्व अधोरेखित होत आहे. या दौऱ्यावरून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात शाब्दिक लढाई सुरू झाल्याचे चित्र आहे.

        भाजपाने ‘ए फाॅर अमेठी मिशन ‘ २०१९ मध्ये यशस्वी केले. आता ‘बी फाॅर बारामती’ मिशनची तयारी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना केरळ मधील वायनाड मधून निवडणूक लढवावी लागली, त्याप्रमाणे बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुसरा मतदारसंघ शोधावा, असे जाहीर आव्हानच भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसला दिले आहे. गेली ५५ वर्षे झाली, आम्ही बघतोय अनेक जण येतात, भेटतात आणि जातात. बारामतीत पंतप्रधान आले त्यांचेही आम्ही स्वागत केले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन, चंद्रशेखर बावनकुळे आले तरी त्यांचेही स्वागतच आहे. बारामतीत कोणीही यावे, बारामतीकरांना भेटावे, मात्र बारामतीकर त्यांना जे हवे आहे तेच करतात, असे उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला दिले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने