पतीनेच पत्नीच्या घरी राहण्यास जावे.

 


        पती-पत्नीत वाद होणे आणि तो नाही मिटला तर घटस्फोटाचा अर्ज करणे हे प्रमाण वाढले असले तरी एका पती पत्नीच्या वादावर अहमदनगरच्या वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने दिलेला निकाल सध्या चांगलाच चर्चेत आहे. विवाहनंतर मुलगी सासरी म्हणजेच मुलाच्या घरी नांदायला जाते, अशीच पद्धत समाजात रुढ आहे. मात्र, नोकरी करणाऱ्या या उच्चशिक्षित जोडप्याच्या बाबतीत पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज नामंजूर करून न्यायालयाने पत्नीचा अर्ज मंजूर केला आहे.  तसेच दोघांनी पुन्हा विवाह संबंध प्रस्थापित करण्याचा आदेश दिला आहे. पत्नी नोकरीच्या ठिकाणी राहते, तिला पतीच्या मूळ घरी येणे शक्य नसल्याने पतीनेच तिच्या घरी जावे, ही पत्नीच्या अर्जातील विनंतीही मान्य झाली आहे. 

        याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील एका उच्च शिक्षित जोडप्याच्या या खटल्याचा निकाल वरिष्ठस्तर दिवाणी न्यायाधीश एस. एस. पारवे यांनी दिला आहे. पती हा शिक्षण विभागात श्रीगोंदा तालुका येथे तर पत्नी कृषी विभागात राहुरी येथे नोकरीला आहे. या दोघांचा विवाह ऑगस्ट २०१४ मध्ये झाला होता. विवाहच्या दोन वर्षानंतर त्यांना अपत्य देखील झाले, मात्र मधल्या काळात त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे दोघेही आपापल्या नोकरीच्या ठिकाणी राहू लागले. परंतु या नंतर पतीने जुलै २०१८ मध्ये न्यायालयात अर्ज करून परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दावा दाखल केला. यावर न्यायालयात सुनावणी झाली. पत्नीनेही वकीलामार्फत न्यायालयात बाजू मांडली यात सासरच्याकडून होत असलेल्या त्रासाची तक्रार केली, तसेच अपत्य लहान असल्याने आपण सुटीच्या दिवशी पतीच्या मूळ घरी नेहमी जाऊ शकणार नाही. त्यामुळे पतीनेच आपल्या घरी यावे. व पतीने केलेला घटस्फोटाचा अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी पत्नीने केली. वकील भगवान कुंभकर्ण आणि वकील शिवाजी सांगळे यांनी विवाहित महिलेच्या बाजूने न्यायालयात बाजू मांडली.

        पतीने  घटस्फोटासाठी युक्तिवाद करताना म्हंटले होते पत्नी तिच्या सासरच्या लोकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचे व तिने आपल्यापासून स्वत:ला दूर केले असल्याने घटस्फोट मिळावा. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने दोघांनी एकमेकांवर केलेले छळासह इतर काही आरोप फेटाळून लावले. व घटस्फोटाचा अर्जही फेटाळून लावला. बाजु ऐकल्यावर कोणी कोणाच्या घरी जायचे यावरून वाद असल्याचे न्यायालयाचे मत बनले. 

        यावर न्यालयाने निरीक्षण नोंदविले कि, अलीकडच्या काळात महिलाही नोकरी करीत आहेत. त्यांचीही अडचण समजून घ्यायला हवी. लहान मुल सोबत घेऊन पत्नीला राहुरी वरुन श्रीगोंद्याला जाणे व  सुट्टी संपल्यावर परत येणे धावपळीचे आणि त्रासाचे होईल. शिवाय पतीची जिल्ह्यात कोठेही बदली होऊ शकते. पत्नीची मात्र बदली होऊ शकत नाही. याव्यतिरिक्त तिला विद्यापीठात सरकारी घरही मिळालेले आहे. ह्या सर्व गोष्टींची लग्नाआधी दोघांनाही कल्पना होती. त्यामुळे आताही दोघांनी परस्पर समजुतीने घेऊन पतीने पत्नी राहत असलेल्या घरी जाणे संयुक्तिक ठरेल. त्यानुसार दोन महिन्यांत दोघांनीही पुन्हा एकत्र यावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने