जालना येथे मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्कचा (MMLP) मार्ग मोकळा.

 


महाराष्ट्रातील जालना येथे मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क (MMLP) विकसित करण्यासाठी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी आणि केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत, राष्ट्रीय महामार्ग  लॉजिस्टिक्स व्यवस्थापन  मर्यादित आणि जेएनपीटी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

मराठवाडा विभागाच्या विकासासाठी सहाय्य्यकारी ठरणारे जालना येथील  मल्टी मोडल लॉजिस्टिक्स  पार्क    हे या प्रदेशातील एक कार्यरत ड्राय पोर्ट म्हणून काम करेल आणि या भागातील भंगारावर निर्भर असलेले पोलाद आणि संबंधित उद्योग,  फळे आणि भाजीपाला प्रक्रिया कंपन्या , बियाणे उद्योग आणि कापूस क्षेत्राला या मल्टी मोडल लॉजिस्टिक्स  पार्कचा    मोठा फायदा होईल, असे  गडकरी यांनी यावेळी सांगितले. हे मल्टी मोडल लॉजिस्टिक्स पार्क, समृद्धी मार्ग आणि दिल्ली-मुंबई औद्योगिक मार्गिकेशी संलग्न असेल, असे त्यांनी सांगितलॆ. या पायाभूत सुविधांमुळे कृषी उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळेल आणि  मराठवाडा क्षेत्राचे  वाहन केंद्र म्हणून  जालन्याची ओळख प्रस्थापित होईल, असे ते  म्हणाले.

बहुविध पायाभूत सुविधांच्या विकासासाठी एक ऐतिहासिक क्षण असल्याचे सांगत गडकरी म्हणाले की, आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने मालवाहतूक बळकटीकरणाचे केंद्रीकरण आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने लॉजिस्टिक खर्च जीडीपीच्या 14% वरून  10% पेक्षा कमी करण्याच्या उद्देशाने, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतमाला प्रकल्पा अंतर्गत 35 मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क्स  (एमएमएलपीज ) विकसित करण्यास मान्यता दिली आहे.हा उपक्रम मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क्सच्या माध्यमातून  विना अडथळा माल वाहतुकीसाठी एक व्यासपीठ प्रदान करेल, असे त्यांनी सांगितले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय  रस्ते, रेल्वे, पाणी आणि हवाई कनेक्टिव्हिटी यासह वाहतुकीच्या शाश्वत पद्धती शोधण्याच्या मोहिमेवर निरंतर कार्यरत आहे, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील जालना येथील मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्कमुळे शेतकऱ्यांना तसेच आयात निर्यातीच्या अनुषंगाने व्यापाराला खूप फायदा होईल, असे सर्बानंद सोनोवाल यांनी यावेळी  सांगितले. महत्त्वाकांक्षी पीएम गतिशक्ती आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण अंतर्गत  लॉजिस्टिक क्षेत्राला चालना मिळून हा प्रकल्प आर्थिक विकासात सहाय्य्यकारी ठरेल, असे ते म्हणाले.  

शेतकऱ्यांना त्यांचा माल कमी खर्चात जागतिक बाजारपेठेत नेण्यासाठी याचा मोठा फायदा होईल यामुळे  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनाची  पूर्तता होईल, असे सोनोवाल यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंग, केंद्रीय राज्यमंत्री आणि जालना मतदारसंघाचे खासदार रावसाहेब पाटील दानवे, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत किसनराव कराड, महाराष्ट्र सरकारमधील मंत्री अब्दुल सत्तार,  उदय सामंत आणि  संदीपान भुमरे  उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने