महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पीठातील एक पूर्ण पीठ म्हणजेच माहुरची रेणुका देवी हे होय हे क्षेत्र महाराष्ट्रतील नांदेड जिल्हात वसलेले एक पवित्र क्षेत्र आहे आज आपण जाणुन घेऊया या विषयी . माहूर गडावर कमलमुखी रेणुकेचे सुंदर कमलाकार मंदिर आहे. हे मंदिर अनादी काळापासून येथे असावे असे सांगंण्यात येते. हे मंदिर यादवराजा देवगिरी यांनी सुमारे 800 ते 900 वर्षापूर्वी बांधले. मंदिराच्या मुख्य दरवाजाची पुर्नबांधणी ही इ.स.1546 मध्ये झाली असून त्या संबधीचा शिलालेख मुख्य दरवाजावर अंकित केलेला आहे. हया मंदिराचा विस्तार तीनशे नव्वद वर्षापूर्वी शालिवाहन राजाने इ.स.1624 च्या सुमारास केला आहे.
हे मंदिर वास्तुशास्त्राच्या नियमानुसार उभारण्यात आले आहे. मंदिर हे गाभारा व सभामंडप या दोन भागात विभागले गेले आहे. गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. गाभाऱ्यातील प्रवेशव्दार चांदीच्या पत्र्याने मढविलेले आहे. देवीचा मुखवटा हा 1.524 मीटर (5 फुट) उंचीचा आहे आणि त्याची रुंदी 1.2192 मीटर (4 फुट) इतकी आहे.
गाभाऱ्या समोर उभे राहताच अत्यंत चित्ताकर्षक तेजोमय देवीचे मुखकमल आपले चित्त केंद्रीत करते. भक्तांकडे कृपादृष्टी टाकणारे सुवर्णनैन, रक्तवर्ण सिंदुरचर्चित मुखावरील शोभा ही अवर्णनीय आहे. डोक्यावर चांदीचा टोप रेणुकेने परिधान केला आहे. पितांबर नेसल्याने ती अधिक मंगलमुर्ती दिसते. विविध सुवर्णाभुषणे तिने परिधान केली आहेत. भाळी मळवट भरलेला असुन, मुखामध्ये तांबुल आहे. हजारो सुर्याचे तेज तिच्या मुखावर प्रगटलेले आहे. अत्यंत चित्तवेधक भेदक नजर सरळ आपल्या हदया मध्ये जाते. शिवाय सभामंडपाच्या परिसरात अग्रपूजेचा मान असणाऱ्या महाकाली व महालक्ष्मीच्या व तुळजाभवानीची मूर्ती आहेत.खालच्या बाजुला परशुराम मंदिर, दर्शनी भागात गणपती मंदिर, विष्णू कवी मठ,पांडवतीर्थ,औदुंबर झरा, जमदग्नी स्थान, अमृत कुंड, आत्मबोध तीर्थ, मातृतीर्थ,रामतीर्थ इ.आहेत.
देवीची आख्यायिका: रेणुका मातेच्या तांदळयाची का पूजा केली जातो? याबाबत अनेक पुराण कथा आहेत. त्यापैकी एका पौराणिक दाखल्यानुसार माता पार्वतीने कुळन देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला. तिचे नाव रेणू ठेवण्यात आले. शंकराचा अवतार मानल्या गेलेल्या जमदग्नी ऋषीसोबत तिचे लग्न झाले. सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी कामधेनू गाय जमदग्नीकडे होती. राजा सहस्त्रार्जुनाला या कामधेनूचा मोह झाला. त्याने जमदग्नीकडे मागणी केली, मात्र ती फेटाळली. तेव्हा जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नसल्याची संधी साधून सहस्त्रयर्जुनाने आश्रमावर हल्ला केला. जमदग्नीला ठार केले आणि कामधेनू हिरावून नेली. त्यानंतर पुत्र परशुराम तेथे आला. हा प्रकार पाहून त्याने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली.
पित्या्चे अंत्यसंस्कार करण्यासाठी कोरी भूमी हवी, म्हणून तिच्या शोधार्थ कावडीच्याञ एका पारडयात जमदग्नीतचे पार्थिव आणि दुस-या पारडयात माता रेणुकेला बसवून रानोमाळ भटकत अखेर तो माहूर गडाला आला. तेथे श्री दत्तात्रेयाने कोरी भूमि दाखविली. येथेच पित्यावर अंत्यसंस्का्र कर, असे सांगितले. परशुरामाने बाण मारुन मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले. या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अंत्यसंस्का्र केले. त्या वेळी माता रेणुका सती गेली. सती गेलेल्यान मातेच्या विरहाने परशुराम दुःखी झाला. तोच आकाशवाणी होऊन,तुझी आई जमिनीतून वर येईल. फक्त तू डोळे मिटून तिचे स्मरण कर, डोळे उघडून पाहू नको,असे सांगण्या त आले. परंतु परशुरामची उत्सुकता शिगेला पोचल्याने त्याने लवकरच डोळे उघडून पाहिले. तोपर्यंत रेणुका मातेचे मुखच वर आले होते. हीच तांदळास्वारुपातले मुख असलेली माहूरची रेणुका होय.
माहूरगडावरील नवरात्रोत्सव: देवी महात्म्यात नवरात्राचे अनन्य साधारण महत्व आहे. हा नवरात्र उत्सव म्हणजेच आदीशक्तीच्या पराक्रमाचा शौर्याचा, रणसंग्रामाचा पवित्र काळ, सतत नऊ दिवस रणचंडीकेने दृष्ट राक्षसां सोबत घणघोर युध्द करुन,आपला पराक्रम दाखविला तो हा कालखंड. महिषासूर हया राक्षसा सोबत सतत नऊ दिवस युध्द करुन त्याचा वध केला. तो हा कालखंड अश्विन शुध्द प्रतिपदेपासून देवीने हा पराक्रम करुन विजया दशमीस विजय संपादन करुन आई सिंहासनावर विराजमान झाली. असा हा कालखंड हयाच कालखंडास "शारदीय नवरात्र" असेही म्हणतात.शारदीय नवरात्रोत्सव रेणुकेच्या गडावर अतिशय शुचिर्भूत वातावरणात, नि:सिम श्रध्देने साजरा केला जातो.
अश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापने ने हया मंगल पर्वास सुरवात होते. विधीवत पूजा-अर्चना करुन हया मंगल दिनी एका दगडाच्या कुंडामध्ये मातृका भरुन त्यावर विवीध पाच प्रकारचे धान्य टाकल्या जाते. त्या कुंडावर मातीचा कलश ठेऊन विडयाची पाने व श्रीफळ ठेवल्या जाते व त्या कुंडाच्या बाजूला पाच ऊस उभारुन पूष्पहार अर्पण केल्या जातो व प्रतिपदेपासून नवमी पर्यंत तेलाचे व तुपाचे अखंड नंदादीप तेवत ठेवल्या जातात. त्याच प्रमाणे प्रतिपदेस घटस्थापने पासून ते दस-यापर्यंत पायस म्हणजे दहिभात, पूरणपोळीचा नैवेद्य नियमीत दाखविला जातो. घटस्थापनेपासून चार दिवसा पर्यंत गडावर रेणुका मंदीरा मध्ये संपूर्ण, विधीवत, यथासांग पूजा विधी नियमीत केल्या जातात.
नवरात्रातील पंचमीस/ललिता पंचमीस देवीचे मुखकमल अत्यंत आकर्षक आणि चित्तवेधक दिसते. हया दिवशी देवीची अलंकार पूजा केली जाते. महापूजा व महाआरती केल्या जाते व सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचा लाभ दिल्या जातो व सुर्यास्तापूर्वी देवीचे अलंकार उतरुन महाआरती केल्या जाते. रात्रो जागरण,गोंधळ व गायक कलवंताच्या हजेरीमधून उदो उदो केला जातो. नवरात्रातील सप्तमीस जवळील महाकालीच्या गडावर जाऊन महाकालीची यथासांग पूजा केली जाते व महाकालीस महावस्त्र अर्पंण केल्या जातात.
अष्टमीस पहाटे विधीवत देवीची सर्व पूजा विधि झाल्यानंतर गुप्त अजाबळी दिला जातो व नंतर यज्ञास सुरूवात होते. सप्तशतीचे पारायण केल्या जाते. होमामध्ये औंदूबर, खैर, पिंपळ, वटवृक्ष, आघाडा या समिधा टाकल्या जातात. दहीभात, धान्य, पाचवृक्षाची लाकडे, अदी होमामध्ये अर्पण केल्या जातात. या पूर्वी नवग्रहाची पूजा केली जाते. सर्वच देव देवतांना अवाहन करुन यज्ञास सुरूवात होते.
नवमीस दिवसभर अष्टमी प्रमाणेच पूजा विधी केली जाते. नवमीचा यज्ञ होऊन मंत्राचा जप केल्या जातो व जप करुन यज्ञात पुरण-पोळीची आहुती दिली जाते व अजाबळी यज्ञ कुंडात दिला जातो नंतर महाआरती पूजा होऊन नवमी यज्ञाची सांगता होते. दशमीस म्हणजे दस-यास देवीचे मुख्य ध्वज उतरवून त्या पवित्र खांबास पंचामृताने स्नान घालून शेंदुर,हळद,कुंकू लावून विधिवत पूजा केली जाते व त्या व त्या देवी ध्वजपताक्यास नविन वस्त्र चढविल्या जाते. पायसाचा नैवेद्य दाखऊन महाआरती केल्या जाते व नंतर गडावरील सर्वच देवी-देवतांजवळ पताका चढविल्या जातो. नंतर रेणुकेचा पुत्र परशुरामाची पालखी सजवून त्या मध्ये परशुरामाची मुर्ती ठेवल्या जाते. त्या पालखीची मिरवणूक काढून ती पालखी सीमोल्लंघना करीता वरदायीच्या पहाडावर जाते. ही परशुरामाची पालखी जेव्हा रेणुका गडावर प्रवेश करते. तेव्हा रेणुकेच्या व्दारा समोर पालखी समोर अजाबळी दिला जातो व रेणुकेस आपटा रुपी वृक्षाची पाने अर्पण केली जातात व महानैवेद्य दाखविल्या जातो. नवरात्रीच्या पूण्य काळात देवीच्या विविध रुपाच्या दर्शनाचा लाभ भाविकास होतो. हया काळा मध्ये रेणुकेच्या मुखकमलाचे दर्शन घेतांना विविध नऊ रुपे पहावयास मिळतात.
टिप्पणी पोस्ट करा