नकारात्मक उर्जा (Negative energy) जाणवत आहे तर करा ह्या देवतेची उपासना.



        नकारात्मक उर्जा (Negative energy)डोक्यात आणि शरीरास जाणवत असेल तर सलग सहा महिने श्री काळभैरव (Kaal Bhairav) साधना करावी. ती साधना तुम्हाला निर्गुणात सरस बनवेल. आध्यात्मिक प्रगतीसाठी सगुणातुन निर्गुणात अनासक्तीने पदार्पण आवश्यक आहे त्यासाठी हि साधना करणे महत्वाचे आहे. परंतु श्री काळभैरवांचा विनाअट ध्यास घेता आला पाहिजे. त्यांचा ध्यास घेतला तर कर्तव्यनिष्ठा देखील ठेवावी लागेल. धरसोडवृत्ती ठेवल्यास हि साधना उपयोगी होणार नाही .श्री काळभैरव साधना करताना जबरदस्ती विनवणी कराल तर उरली सुरली सुखशांती गमावुन बसाल. श्री काळभैरवांची अनुभूती येणे ही आत्ममार्ग निर्धोक सुरु असल्याची पुष्टी करते. श्री काळभैरवाच्या कक्षेत आल्याशिवाय नशिबाचे चक्र फिरत नाही. भैरवनाथ प्रामाणिक आणि तळमळीला धावुन येतात. मन हृदय आणि नियती स्वच्छ हवी. 

        श्री काळभैरव हे अकरा भैरवांचे अधिपती असुन, श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे. काळ वेळेच्या अधीन नियती आहे. ही सर्व सदगुरुंच्या अधीन आहेत. आणि श्री काळभैरव सदगुरुंचा दास आहे. जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजु आहे, हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे. ज्याची काया सर्वात मोठी आहे. जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे. असा हा शामवर्ण काळभैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करुन कार्यारंभ करतात.

        काळभैरव साधनेमुळे मानवाला ग्रासणारे पितृदोष. नजरदोष, ग्रहबाधा, शत्रूबाधा, भुत प्रेत पिशाच्चबाधा, करणी, भानामती, तसेच ईंद्र, कलि, माया निर्मित संकट मालिकांपासुन मुक्तता मिळते. मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत. श्री कालभैरव रुद्र असल्याने त्यांना आदिपुरूष म्हणता येईल, त्यांची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य, पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवुन देते. पण साधकाची ही पात्रता तशीच असावी लागते. हे दैवत विधिलिखितही अडवतं. श्री काळभैरव शैतानी शक्तीना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे.  साधकाचे नेहमी विवेकशील संयमी आणि पारदर्शी चारित्र्य असावे ही श्री कालभैरव साधकाची प्राथमिक पात्रता असुन तिथे व्याभीचार लबाडी आणि खोटेपणास थारा नाही. व्याभीचार लबाडी आणि खोटेपणा करणाऱ्यासाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे. मृत्युपेक्षाही भयानक आहेत. उलट सदगुरु दासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत. ते घरातील वास्तुपुरुषापासुन ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवु शकतात. 

        गोस्वामी तुलसीदास यानी देखील भैरवयातना भोगल्या आहेत.श्री कालभैरवाच्या निर्व्याज साधनेने गमावलेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो. मनात भय रहात नाही,आंतरिक विचारात बळ येते. जीवनाचा दृष्टीकोण विशाल होतो. शैतानी शक्तीपासुन आत्मरक्षा होते. अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतुन मनुष्य दुर जातो. आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते. कठिण कार्य सहज पूर्ण होतात. आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते. सदगुरु हे कामधेनु आहेत, श्री काळभैरव तत्व सदगुरु अधीन असल्याने सदगुरु प्रणित माळेने दश भैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते. पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही.

        श्री काळभैरव यांनी  मृत्यु , देवराज ईंद्र, ब्रम्हदेव, नृसिंहदेव आणि भगवान विष्णु यांचा गर्वहरण केले होते. लोकानाच काय तर साधु योगिजनाना देखील त्यांचा अभ्यास होवु शकला नाही. शनीदेवता हा श्री काळभैरव देवांचा सर्वात मोठा भक्त आहे. श्री काळभैरव जितका सिद्ध योग्यांचा तितकाच महाचांडाळांचाही आहे. म्हणुनच प्रामाणिक आणि पारदर्शी रहावे. श्री काळभैरव दैवत सूक्ष्म देहातील वासनेची कर्म नष्ट करतात. काळभैरवाना क्षेत्रपाल असेही म्हणतात. क्षेत्र म्हणजे शरीर. पाल म्हणजे पालन करणारा. तो कर्म आणि अकर्माच्या गोंधळातुनही सोडवितो. 

        'ॐ काळभैरवाय नम' हा देवाचा जपमंत्र आहे. जपासाठी रुद्राक्षमाळा वापरतात. स्फटिक माळही चालते. महिला देखील हा जप करु शकतात. प्रामाणिक असल्यावर देवापुढे स्त्री पुरुष हा भेद रहात नाही. भैरवप्रहर हा रात्री १२ ते पहाटे ३ असा आहे.  ह्या प्रहरात भैरवसाधना केल्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरते.  तप, जप आणि ध्यान मार्गात अग्रेसर होत असताना प्रथमदर्शनी बाह्य आवरणात्मक शुद्र शक्ती विविध रुपं आणि स्वरुपाद्वारे साधकाला भटकाव उत्पन्न करतात. हे अतिशय भयानक मायाजाळ आहे. त्यातुन सहज योग्य मार्ग बाह्यशक्ती कधीही सापडु देत नाही, यालाच आंतरिक चकवा असे म्हणतात. ह्या चकव्यापासुन साधकाला काळभैरव दुर ठेवतात. काळभैरवाची सेवा केल्यास मृत्युनंतर पिशाच्च योनी कशी मिळेल? त्यांची सेवा हा मृत्युवर विजयप्राप्तीची सुवर्णसंधी आहे.

        पंचमहाभुतांपलिकडे शिवतत्व आहे. साधकाला श्री काळभैरवनाथ श्री दत्तकृपेने तिथे घेउन जातात. श्री काळभैरवाची सेवा केल्यास शिवाची साधना आपोआप साध्य होते. श्री काळभैरव यांचे प्राचीन मंदीरात गेल्यावर देवाच्या मुर्तीकडे एकटक पहावे. सात्विकता डोळ्यात भरुन येईल. भैरवोत्थान केवळ पद्मासनातच साध्य होते. श्री काळभैरव पाताळवासी आहेत. त्याना दक्षिणेश्वर असेही म्हणतात. नक्षत्रे त्यांच्या आज्ञेची प्रकर्षाने वाट पहातात. त्याना प्रसन्न केल्यास नक्षत्रांचे फळ तुमच्या खिशात. श्री काळभैरवाच्या आज्ञेशिवाय कोणत्याही सूक्ष्मक्षेत्रात प्रवेश नाही. 

स्रोत: astrozoom(dot)in यांच्या बरोबरच्या विशेष करारा अंतर्गत


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने