Pitru Paksha: प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे का गरजेचे आहे ?

 

प्रतिवर्षी श्राद्धविधी करणे हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचारधर्म असून त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.(Performing Shraddha is an important ritual in Hinduism) पुराणकाळापासून चालत आलेल्या या विधीचे महत्त्व आपल्या ऋषीमुनींनी अनेक धर्मग्रंथांतून लिहून ठेवले आहे. श्राद्धविधी करण्याचे महत्त्व आणि त्याची आवश्यकता या बाबतीत धर्मशास्त्र असे  सांगते की 

‘देव, ऋषी आणि समाज या तीन ऋणांसह पितृऋण फेडणे महत्त्वाचे कर्तव्य आहे. पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे आणि त्यांना सुख वं संतुष्टी मिळेल अशी कृत्ये करणे, हे वंशजांचे कर्तव्य आहे. श्राद्ध करणे, हा धर्मपालनाचाच एक भाग आहे. 

आपल्या जन्म्दात्यांचे पितर हे त्यांच्या पुत्रांनी पिंडोदक (पिंड आणि उदक) दिल्यावरच सुखी आणि संतुष्ट होतात. यासंदर्भात ‘पुत्र कोणाला म्हणावे’, याविषयी महाभारतात दिलेला श्लोक पुढीलप्रमाणे आहे.

पुन्नाम्नो नरकाद्यस्मात् त्रायते पितरं सुतः । तस्मात्पुत्र इति प्रोक्तः स्वयमेव स्वयम्भुवा ।। – महाभारत १.७४.३९

याचा अर्थ मुलगा हा आपल्या पितरांचे (पूर्वजांचे) पुं नामक नरकापासून रक्षण करतो, म्हणून त्याला स्वतः ब्रह्मदेवानेच ‘पुत्र’ म्हटले आहे. या श्लोकानुसार पितरांना सद्गती लाभावी, त्यांना भोगाव्या लागणार्‍या अनंत यातनांतून त्यांची सुटका व्हावी आणि पितरांनी पितृलोकातून वंशावर कृपादृष्टी ठेवावी, यांसाठी पुत्राने श्राद्धादी विधी करावेत. स्वतःला पुत्र म्हणवणार्‍यांचे ते कर्तव्यच आहे, हे स्पष्ट होते. तसेच उपनिषद् एक श्लोक आहे

देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । – तैत्तिरीयोपनिषद् १, अनुवाक ११, वाक्य २

याचा अर्थ देवकार्य आणि पितृकार्य यांत कधीही प्रमाद करू नये. ती कार्ये टाळू नयेत.हि कार्य मनुष्य जन्मात महत्वाची कार्य आहेत. श्राद्धविधी न करणार्‍यांच्या संदर्भात गीतेतील पुढील श्लोक चिंतनीय आहे.

पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः । – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १, श्लोक ४२

याचा अर्थ अशा होतो अशांचे (श्राद्धविधी न करणार्‍यांचे) पितर पिंडश्राद्धतर्पणादी क्रिया न केल्यामुळे नरकात जातात. याचाच परिणाम म्हणून आपला भाग्योदय  होत नाही. तसेच सुमंतुऋषी सांगतात, `श्राद्धात् परतरं नान्यत् श्रेयस्करमुदाहृतम् ।’ म्हणजे श्राद्धापेक्षा अधिक श्रेयस्कर अन्य काही नाही. याकरिताच विवेकी माणसाने श्राद्ध कर्मे कधी टाळू नये. ब्रह्मवैवर्तपुराण अनुसार देवकार्या पेक्षा अधिक महत्त्वाचे पितृकार्यचे आहे म्हणूनच सर्व मंगल कार्यांतही नांदी श्राद्धाचे विधान सर्वप्रथम असते. ब्रह्मपुराणात याबात असे वर्णन आहे की  जी व्यक्ती विधीपूर्वक आपल्या आर्थिक स्थितीनुरूप श्राद्ध करते, ती ब्रह्मदेवापासून तृणापर्यंत सर्व जिवांना तृप्त करते. श्राद्ध करणार्‍याच्या कुळात कोणी दुःखी रहात नाही.’

एखाद्या मृत व्यक्तीची आपले श्राद्ध व्हावे अशी इच्छा असली आणि अपेक्षितांकडून ती पूर्ण झाली नाही, तर वासना-अतृप्तीचे दुःख त्याला होते. असा एखादा मृतात्मा पिशाच (आसुरी शक्तीचा एक प्रकार) होऊन श्राद्ध न केल्याचा राग नातेवाइकांवर काढण्याची शक्यता असते. ज्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो व घरात अशांती नांदते.   

एखाद्याला श्राद्धामध्ये काही अर्थ नाही म्हणून आपण निवर्तल्यावर आपल्यासाठी श्राद्ध करायला नको असे वाटत असेल आणि त्याच्या इच्छेनुसार मृत्यूनंतर नातेवाईकांनी श्राद्ध न केल्याने आपण अडकलो आहोत, अशी जाणीव झाली तरी तो तसे सांगू शकत नाही. इच्छा पूर्ण न झाल्याने तो दुःखी होऊ शकतो. हे लक्षात घेऊन प्रत्येकासाठी श्राद्ध करणे हेच योग्य आहे.

सध्याच्या काळात पूर्वीप्रमाणे कोणी श्राद्धादी विधी, तसेच साधनाही करत नसल्याने बहुतेक सर्वांनाच अतृप्त पूर्वजांमुळे त्रास होतो. आपल्याला पूर्वज त्रास देत आहेत किंवा पूर्वजांमुळे त्रास होण्याची शक्यता आहे, याविषयी उन्नतच (संतच) सांगू शकतात. तसे सांगणारे उन्नत न भेटल्यास पुढेप्रमाणे काही त्रास पूर्वजांमुळे होऊ शकतात. घरात सातत्याने भांडणे होणे, एकमेकांशी न पटणे, नोकरी न मिळणे, घरात पैसा फार काळ न टिकणे, एखाद्याला गंभीर आजार होणे, सर्व परिस्थिती अनुकूल असूनही लग्न न होणे, पती-पत्नीचे न पटणे, गर्भधारणा न होणे, गर्भधारणा झाल्यास गर्भपात होणे, अपत्य जन्माला आल्यास मतीमंद किंवा विकलांग जन्माला येणे आणि कुटुंबातील एखाद्याला व्यसन लागणे.

यासाठी श्राद्धविधी केल्याने पितर संतुष्ट होतात. त्यामुळे त्यांचे आशीर्वाद लाभतात. तसेच मर्त्यलोकात अडकलेल्या पूर्वजांना गती मिळाल्याने त्यांच्यामुळे होणार्‍या त्रासांचे निवारण होते. मृत व्यक्तीच्या तिथीला श्राद्ध केल्यामुळे ते अन्न तिच्या सूक्ष्म-देहाला वर्षभर पुरते. जोपर्यंत इच्छा-आकांक्षा असतात, तोपर्यंत ती मृत व्यक्ती त्या तिथीला आपल्या वंशजांकडून अन्न मिळण्याची अपेक्षा ठेवते. श्राद्ध केल्याने त्यांची इच्छापूर्ती तर होतेच, तसेच त्यांना पुढे जाण्यासाठी ऊर्जाही मिळते. पूर्वजांची एखादी जरी वासना तीव्र असली, तरी श्राद्धविधींद्वारे मिळणारी ऊर्जा त्यांच्या वासनापूर्तीसाठीच वापरली गेल्याने पितरांना पुढे जाण्यास गती मिळत नाही. त्यामुळे सातत्याने श्राद्ध केल्याने हळूहळू त्यांची वासना न्यून होत जाऊन ते गतीस प्राप्त होऊ शकतात. तसेच शास्त्रनियमाप्रमाणे आपण हयात असेपर्यंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिवर्षी श्राद्ध करणे, हेच योग्य आहे.

कलियुगात रज-तमाच्या आधिक्यामुळे साधना करणार्‍यांचे प्रमाण अल्प असते. त्यामुळे अतृप्त इच्छांमुळे जिवाला पुढची गती मिळत नाही. तसेच साधनेचे बळ नसल्याने जीव गटांगळ्या खात रहातो. श्राद्धपक्षादी विधी न केल्यास पूर्वजांना गती मिळत नाही. तसेच तीर्थक्षेत्री श्राद्ध केले, तरी ज्या पितरांची पुढील गती मिळण्याची वेळ जवळ आली असेल, तेवढ्याच पूर्वजांना त्या वेळी गती मिळते. त्याव्यतिरिक्त इतर पूर्वजांसाठी प्रतिवर्षी श्राद्ध करणे आवश्यक असते. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने