पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे 'रोजगार मेळा 10 लाख कर्मचार्यांसाठी भरती मोहिम' याचा प्रारंभ केला. या समारंभात 75,000 नवनियुक्त उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. नियुक्त करण्यात आलेल्या उमेदवारांना मार्गदर्शन करताना, पंतप्रधान मोदी यांनी प्रारंभी धनत्रयोदशीच्या शुभेच्छा दिल्या. "आजचा दिवस विशेष आहे, कारण या दिवशी रोजगार मेळ्याच्या रूपाने एक नवीन दुवा देशातील रोजगार आणि स्वयंरोजगार मोहिमेशी जोडला जात आहे. या मोहिमा गेल्या 8 वर्षांपासून देशात सुरू आहेत", असे ते म्हणाले.
स्वातंत्र्याची 75 वर्षे लक्षात घेऊन केंद्र सरकार या एका कार्यक्रमांतर्गत 75,000 तरुणांना नियुक्ती पत्र देत आहे. रोजगार मेळ्याचे कारण स्पष्ट करताना पंतप्रधान म्हणाले की, “आम्ही ठरवले की एकाच वेळी नियुक्तीपत्रे देण्याची परंपरा सुरू करावी, त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा सामूहिक भावना सर्व विभागांमध्ये विकसित होईल”. आगामी काळातही उमेदवारांना शासनाकडून वेळोवेळी नियुक्तीपत्रे मिळणार आहेत, असेही मोदी म्हणाले. "मला आनंद आहे की, अनेक एनडीए -शासित आणि भाजपशासित राज्यांसह केंद्रशासित प्रदेश देखील यापुढे अशाच प्रकारचे मेळे आयोजित करतील ", असे ते पुढे म्हणाले.
आज नव्याने नियुक्त झालेल्या उमेदवारांचे स्वागत करून या उमेदवारांच्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले, अमृत काळामध्ये तुम्हा सर्वांची नियुक्ती होत आहे. विकसित भारताच्या संकल्पाच्या पूर्ततेसाठी, आपण स्वावलंबी भारताच्या मार्गावर पुढे जात आहोत. भारताला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर नेण्यात नवोन्मेषी, उद्योजक, उद्योगपती, शेतकरी आणि उत्पादन तसेच सेवा क्षेत्रातील लोकांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. 'सबका प्रयास'चे महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, या प्रवासात प्रत्येकाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत आणि जेव्हा सर्व महत्त्वाच्या सुविधा सर्वांपर्यंत पोहोचतील तेव्हाच 'सबका प्रयास'ची ही भावना सार्थ ठरणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा