लटकेंचा राजीनामा आता लटकणार नाही, न्यायालयाने मुंबई महापालिकेला सुनावलं, म्हणाले...


ब्युरो टीम : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाची उमेदवारी मिळालेल्या ऋतुजा लटके यांचा राजीनामा तातडीने स्वीकारावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. लटके यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला हा मोठा दिलासा मानला जातोय. राजीनामा स्वीकारल्याचे पत्र लटके यांना उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत द्या, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला देतानाचा पालिकेला चागलंच सुनावलं आहे.

सुनावणीदरम्यान राजकीय दबावापोटीच राजीनामा थांबवण्यात आल्याचा आरोप यावेळी ऋतुजा लटके यांच्यावतीने करण्यात आला होता. तर राजीनाम्याची योग्य प्रक्रिया अवलंबली नसल्याचा युक्तिवाद पालिकेने केला होता. अखेर दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने पालिकेला खडसावलं असून तुमच्याकडे विशेषाधिकार असताना अशी प्रकरणं आमच्याकडे येता कामा नयेत, असं सांगितलं आहे. ‘एका सामान्य कर्मचाऱ्याच्या राजीनाम्याला एवढे महत्त्व का दिले जात आहे. उलट एका कर्मचाऱ्याला निवडणूक लढवायची आहे, तर तुम्ही त्याचा राजीनामा स्वीकारायला हवा. हे प्रकरण इथपर्यंत यायलाच नको होता,’ असेही न्यायालयाने पालिकेला सुनावले. 

नेमकं काय आहे प्रकरण? लटके या 2006 पासून मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत आहेत. परंतु पतीच्या निधनानंतर त्यांना ही पोटनिवडणूक लढवण्यासाठी ठाकरे गटातर्फे उमेदवारी देण्यात आली. त्यांचाही ही पोटनिवडणूक लढवण्याचा मानस असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोबर आहे. पोटनिवडणूक लढवता यावी यासाठी आपण ३ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेकडे राजीनामा सादर केला होता. तसेच त्यासाठीच्या सर्व औपचारिकताही पूर्ण केल्या. परंतु आजपर्यंत महानगरपालिका प्रशासनाने त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही आणि आवश्यक ते आदेश काढलेले नाहीत. निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार, नोकरीचा राजीनामा दिला तरच लटके या निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करू शकतात. अखेर लटके यांनी न्यायालयात धाव घेऊन त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीह याचिकेत केली होती.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने