महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदच्या जिल्हाध्यक्षपदी आफताब शेख, एस.एम.देशमुख यांनी केली घोषणा

 


ब्युरो टीम : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रिंट व डिजिटल मीडियाच्या माध्यमातून बातम्या, चालू घडामोडी समाजासमोर मांडल्या जातात. आजही प्रिंट मीडियावरती समाजाचा मोठा विश्‍वास आहे. तोच विश्‍वास डिजिटल मीडियाने प्राप्त करण्याचे प्रतिपादन मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख यांनी केले.

 मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र डिजिटल मीडियाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी आफताब मन्सूर शेख यांची नियुक्ती जाहीर करुन त्यांचा सत्कार एस. एम. देशमुख यांनी केला. यावेळी देशमुख बोलत होते. याप्रसंगी राज्य अध्यक्ष शरद पाबळे, वरिष्ठ पदाधिकारी मन्सूर शेख, प्रदीप पेंढारे, निलेश आगरकर, विक्रम बनकर, महेश भोसले, आबिद खान, बाबा ढाकणे, यतीन कांबळे, शब्बीर सय्यद, मुकुंद भट, शुभम पाचरणे, सौरभ गायकवाड, सागर तनपुरे, अमीर सय्यद, अन्सार सय्यद, वैभव घोडके, तुषार चित्तम, दीपक कासवा, सबिल सय्यद, अनिकेत यादव, प्रियंका धारवाले,मंजू भागानगरे आदी उपस्थित होते.

पुढे एस.एम. देशमुख म्हणाले की, समाजाचा डिजिटल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन योग्य नाही. हा दृष्टीकोन आपल्या कामातून बदलण्याची गरज आहे. राज्यभर डिजिटल मीडियाचे सुमारे पंधरा ते वीस हजार पत्रकार काम करत आहेत. त्यांना मराठी पत्रकार परिषदेच्या छताखाली आणून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन दरबारी मराठी पत्रकार परिषद प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. आफताब शेख हे जिल्ह्यातील डिजिटल मीडियातील पत्रकारांना संघटित करून चांगला काम उभा करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली. तर अहमदनगर जिल्ह्याचा पत्रकारितेमध्ये राज्यात एक वेगळा ठसा व दबदबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शरद पाबळे म्हणाले की, मराठी परिषदेचे काम राज्यभर उत्कृष्ट पद्धतीने सुरु आहे. पत्रकारांचे विविध प्रश्‍न प्रलंबित असून, ते सोडविण्यासाठी मुख्य विश्‍वस्त एस.एम. देशमुख काम करत आहेत. पत्रकारांच्या संरक्षणापासून ते त्यांच्या आरोग्यापर्यंतचे प्रश्‍न सोडविले गेले आहेत. पत्रकारितेचे जुने स्वरूप आता बदलत चाललेले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल मीडियाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यासाठी मराठी पत्रकार परिषद आपल्या संलग्न महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना केली आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आफताब शेख यांची निवड केली आहे. ते नक्कीच या पदाला न्याय देतील व डजिटल मीडियाची जिल्हा कार्यकारणी जाहीर करतील, असे ते म्हणाले.

जिल्हाध्यक्ष आफताब शेख यांनी जिल्हाध्यक्षपदाची सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणार असून, या क्षेत्रात कार्य करणार्‍या युवा पत्रकारांना बरोबर घेऊन काम केले जाणार आहे. पदाच्या माध्यमातून डिजीटल मीडिया मधील पत्रकारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर लवकरच डिजिटल मीडियाची कार्यकारणी जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषद अहमदनगर शाखेचे उद्घाटन देखील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने