ब्युरो टीम : ऑस्ट्रेलिया येथे होत असलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामन्यांत अखेरच्या चेंडूवर पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानच्या संघाला स्पर्धेतील आपले आव्हान टिकविण्यासाठी आज, रविवारी (३० ऑक्टोबर २०२२) होणाऱ्या नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. तुलनेने दुबळय़ा नेदरलँड्सविरुद्ध रविवारी पाकिस्तानचा संघ मैदानावर उतरेल, तेव्हा त्यांचे मोठय़ा विजयासह निव्वळ धावगती वाढवण्याकडे लक्ष असेल. हा सामना जर पाकिस्तान हरला, तर त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल.
पाकिस्तानला भारतापाठोपाठ झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला. धावांसाठी पाकिस्तानचा संघ कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या सलामीच्या जोडीवर अवलंबून आहे. मात्र, पहिल्या दोन्ही सामन्यांत या दोघांना सूर गवसलेला नाही. त्यामुळे नेदरलँड्सविरुद्ध पाकिस्तानला विजय मिळवायचा असल्यास या जोडीला मोठे योगदान द्यावे लागेल. नेदरलँड्सने एकदिवसीय सामन्यात दोन वेळा पाकिस्तानला झुंजवले होते. हा इतिहास पाकिस्तानला विसरता येणार नाही.
पाकिस्तान संघ व्यवस्थापनाला अंतिम अकरा खेळाडूंची निवड करताना बराच विचार करावा लागेल. दुसरीकडे नेदरलँड्सला या स्पर्धेत भारताने सहज नमवले, पण त्यांनी बांगलादेशला विजयासाठी झुंजवले. त्यामुळे पाकिस्तानला देखील या संघाला हलक्यात घेणं परवडणारे नाही. पर्थमध्ये हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी साडेबारा वाजल्यापासून या सामन्याचे थेट प्रेक्षपण पाहता येईल.
टिप्पणी पोस्ट करा