Maharashtra vs Karnatak : फडणवीसांचा अमित शाह यांना फोन



ब्युरो टीम : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी फोनवरून चर्चा केली आहे.  सीमाप्रश्नी गृहमंत्र्यांनी लक्ष घालावं, अशी विनंती फडणवीसांनी अमित शाहांकडे केली आहे. याबाबतची माहिती फडणवीसांनी स्वत: माध्यमांशी बोलताना दिली.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मी फोनवरून चर्चा केली. सीमाप्रश्नावर अलीकडच्या काळात घडलेली संपूर्ण परिस्थिती त्यांच्यासमोर मांडली आहे. विनाकारण महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ले योग्य नाही, हेही त्यांच्या लक्षात आणून दिलं आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी माझा काल फोनवरून झालेला संवादही त्यांच्या कानावर घातला आहे.सीमावादावर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी मला आश्वासित केलं आहे. तरीही गृहमंत्री अमित शाह यांनी यामध्ये लक्ष घालावं. त्यांनीही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना स्पष्टपणे सांगावे, अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. अमित शाह यात निश्चितपणे लक्ष घालतील,” अशा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सीमावाद पेटला आहे. महाराष्ट्राच्या काही वाहनांवर कर्नाटकमध्ये हल्ला करण्यात आला आहे.  याच पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी काल कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. तर, आज त्यांनी याबाबत अमित शाह यांच्याशी चर्चा केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने