ब्युरो टीम : आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ येथे आज भेट घेतली. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. अलीकडेच त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी युती केली. त्यातच आज त्यांनी आप च्या नेत्यांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी एक महत्वाचे विधान केले आहे. 'अरविंद केजरीवाल कशासाठी आले आहेत? हे वेगळं सांगण्याची गरज नाही,' असं ते म्हणाले.
दुसरीकडे, येणाऱ्या काळात आम आदमी पार्टी आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढणार आहे का? असं विचारलं असता अरविंद केजरीवाल म्हणाले, 'देशात फक्त एकच राजकीय पक्ष आहे, जो दिवसातील २४ तास निवडणुकांबाबत विचार करतो. आम्ही २४ तास निवडणुकीचा विचार करत नाही. आम्ही देशाचा विचार करतो. त्याअनुषंगाने आमची विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. पण जेव्हा निवडणूक येईल, तेव्हा निवडणुकीचीही चर्चा करू,'असे सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
टिप्पणी पोस्ट करा