Ajit Pawar : चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जायचं काय?अजितदादांचा संतप्त सवाल



ब्युरो टीम : 'मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जायचं काय? असा संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केलाय. महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून म्हणजेच २७ फेब्रुवारीपासून सुरु होतंय. २५ मार्चपर्यंत हे अधिवेशन असेल. अधिवेशनच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं.

मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या 'वर्षा' बंगल्याचं ४ महिन्यांचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख रुपये आलेलं आहे. प्रसारमाध्यमांनी तशा बातम्या दिलेल्या आहेत.  यावरून अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले,' एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष आहे. सत्तांतर झाल्यापासून एकही नवा उद्योग राज्यात आलेला नाही. उलट इथले उद्योग गुजरातला जात आहेत. सत्ताधारी पक्षाचे आमदार शिव्यांची लाखोली वाहत आहेत, कुणी मारहाण करतंय तर कुणी गोळीबार करतंय. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडालाय. जाहिराताच्या नावाखाली सरकारने ५० कोटी खर्च केलाय. मुंबई महानगर पालिकेकडून आम्ही माहिती घेतली तर तिथून ८ कोटी रुपये खर्च केल्याची माहिती आहे. यांचे हसरे फोटो दाखवण्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली गेली. मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम केलंय. माझ्या अनेक सहकाऱ्यांनीही मुख्यमंत्री म्हणून काम केलंय. वर्षा बंगल्याचं ४ महिन्यांचं खानपानाचं बिल २ कोटी ३८ लाख रुपये आलेलं आहे. वर्षा बंगल्यावर चहामध्ये काय सोन्याचं पाणी घातलं जायचं काय? की पानाला सोन्याचं वर्क केलं होतं? असा सवाल अजित पवारांनी उपस्थित करीत सत्तापक्षावर जोरदार हल्लाबोल केला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने