Uddhav Thackeray : निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्धव ठाकरे संतप्त, म्हणाले...



ब्युरो टीम : 'काय सुरुवात करायची आणि काय बोलायचे हा मोठा प्रश्न आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. मी तर असे म्हणेन की दुर्दैदाने आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर घोषणा करायला हरकत नाही की ७५ वर्षांचे स्वातंत्र्य संपले आहे. आम्ही बेबंदशाहीला सुरुवात केली आहे,' असे वक्तव्य  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी करीत निवडणूक आयोगावरच तोफ डागली आहे.

निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे.  आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव तसेच पक्षाचे धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटला दिले आहे. बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. या निर्णयानंतर   उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

'न्याय यंत्रणा आपल्या दबावाखाली कशी येईल, त्यासाठी मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री बोलत आहे. त्यांना न्यायमूर्ती नेमण्याचेही अधिकार हवे आहेत. देशातील लोकशाही संपलेली आहे. आजचा निर्णय अत्यंत अनपेक्षित आहे. जवळपास सहा महिने ही लढाई सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. येत्या २१ तारखेपासून याबाबत सलग सुनावणी सुरू होईल,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'आज आमच्यातील मिंधे गटाची, आणि भाजपाची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांना स्वत: लढण्याची हिंमत नाही. मी अनेकदा निवडणूक घ्या, असे म्हणालो आहे. मात्र ज्या पद्धतीने धनुष्यबाण आणि शिवसेना मिंधे गटाला दिलेले आहे, त्यानुसार कदाचित येत्या महिना किंवा दोन महिन्यांत पालिकेच्या निवडणुका जाहीर होऊ शकतील. त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुंबई पालिका जिंकायची आहे,' अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने