kasba Election : नानाभाऊ, थोडं आत्मचिंतन तुम्हीही करा… फडणवीसांची खोचक टिप्पणी

 

ब्युरो टीम : कसबा विधानसभा पोटनिवडणूक निकालांचे पडसाद थेट राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात उमटल्याचं पाहायला मिळालं. विधिमंडळात या निकालाची माहिती देणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देवेंद्र फडणवीसांनी खोचक शब्दांत टोला लगावला. ‘आताच कसबा पोटनिवडणुकीचा निकाल आला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ११ हजारांच्या मताधिक्याने निवडून आलेत. त्यांच्या बसण्याची जागा आपल्याला निश्चित करावी लागेल’, असं नाना पटोले म्हणाले. पण त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तितकीच खोचक टिप्पणी करीत पटोलेंना प्रत्युत्तर दिले.

 नाना पटोलेंना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘मी नानाभाऊंचं अभिनंदन करतो. जो काही निकाल आहे तो स्वीकारला पाहिजे. तसाच चिंचवडचाही निकाल येणार आहे, तोही स्वीकारलाच पाहिजे. प्रश्न एवढाच आहे नानाभाऊ, जसं कसब्याचं आत्मचिंतन आम्ही करू, तसंच तुम्हालाही आत्मचिंतन करावं लागेल. तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस कुठे दिसतच नाहीये. आता तुमच्यावर ही स्थिती आली नानाभाऊ की एखादा विजय मिळाला तर तुम्हाला सभागृहात उभं राहून सांगावं लागतं. त्यामुळे थोडं आत्मचिंतन तुम्हीही करा, थोडं आम्ही करू.’

दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपाच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरात उमेदवारी न दिल्यामुळे भाजपाविरोधात नाराजीचं वातावणर असल्याचं बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपा उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने