ब्युरो टीम : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी मालेगावात जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी काँगेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींना सावरकर अवमानप्रकरणी इशारा दिला. या इशाऱ्यावरून भाजपा नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
विखे पाटील म्हणाले, 'उद्धव ठाकरेंच्या अधिपत्याखाली सरकार असताना, औंरंगाबादमधील औरंगजेबच्या कबरीवर फुलं उधळली गेली. त्यावेळी हे गप्प बसले. सत्ता गेल्यावर त्यांना आता सावरकर दैवत वाटायला लागले, ही चांगली बाब आहे. मात्र, ज्यांनी सत्ता मिळवण्यासाठी हिंदुत्वाशी फारकत घेतली, त्यांच्या तोंडी ही विधानं शोभत नाहीत,' असा घणाघात विखे पाटलांनी केला.
दरम्यान, ‘२०२४ नंतर भाजपा सरकार आलं, तर देशात निवडणुका होणार नाहीत’ या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याबाबत विचारलं असता विखे पाटील म्हणाले, 'मागील पंचवीस वर्षे शिवसेनेनं भाजपाबरोबर युती केली, त्यावेळी उद्धव ठाकरेंना उपरती झाली नाही. त्यामुळे विश्वासघाताने सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपद मिळवलेल्या उद्धव ठाकरेंना हे वाक्य शोभत नाही. उलट त्यांनी आत्मपरीक्षण करावं, हेच योग्य राहील.'
टिप्पणी पोस्ट करा