Municipal Corporation Election:राज्यातील महापालिकांच्या निवडणुकाबाबत मंत्री चंद्रकांत पाटलांचे महत्त्वपूर्ण भाकीत;

 


ब्युरो टीम: कोरोना काळापासून राज्यातील महापालिकांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी महानगरपालिकांच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचं भाकीत केलं आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होतील, असे संकेत त्यांनी दिले. तसेच राज्यातील महानगरपालिका निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होऊ शकतात असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

 

ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेच्या मुद्यावरून सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. यासंबंधीचे कायदेशीर समस्या मे महिन्यापर्यंत निकालात निघू शकतात. सर्वोच्च न्यायालयाची उन्हाळी सुट्टी सुरु होण्यापूर्वी पालकिकांच्या निवडणुकांच्या प्रकरणावर निर्णय दिला जाऊ शकतो. त्यामुळे पुढील मार्ग मोकळा होईल. त्यानंतर पावसाळ्यात प्रभाग रचना आणि इतर निवडणूक प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबर महिन्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होऊ शकतात, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते बुधवारी माध्यमांशी बोलत होते.

राज्यातील अनेक महानगरपालिकांची मुदत उलटून गेल्यामुळे त्या विसर्जित झाल्या आहेत. त्यामुळे या महानगरपालिकांचा कारभार सध्या प्रशासकांच्या माध्यमातून सुरु आहे. यामध्ये मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, नाशिक, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, कोल्हापूर, नवी मुंबई या महानगरपालिकांचा समावेश आहे. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद या सारख्या महत्त्वाच्या शहरांमधील कारभार दीर्घकाळ प्रशासकांमार्फत चालवणे श्रेयस्कर नाही. तसेच विरोधकांकडून देखील महापालिकांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने