ब्युरो टीम: हवामान विभागाने गुरुवार, शुक्रवार, शनिवार या तीन दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांत, तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर पुन्हा एकदा अवकाळीचे ढग येण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ येथे गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासोबतच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथेही पाऊस पडेल. या काळात वाऱ्याचा वेगही वाढण्याची शक्यता आहे. नाशिक, अहमदनगर, पुणे येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, बीड, उस्मानाबाद येथे शनिवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला. विदर्भात अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ येथे शुक्रवारपर्यंत ‘यलो अॅलर्ट’ आहे. शनिवारी वातावरण पुन्हा निवळण्याची शक्यता आहे. पश्चिमी प्रकोपाची स्थिती, विखंडीत वारे या प्रभावाखाली राज्यात पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. मराठवाड्यामध्ये शनिवारी बहुतांश जिल्ह्यात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा