Sanjay Raut : संसदेला टाळे, प्रशासन गुलामासारखा पायरीवर बसलेला, संजय राऊत यांचा घणाघात



ब्युरो टीम :  नगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळाव्याचे आयोजन शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटाचे नेते खासदार तथा सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी केंद्रातील व राज्य सरकारवर तोफ डागली. 'देश हा भांडवलदारांच्या हातामध्ये गेला आहे. ज्या स्वायत्त संस्था आहेत, त्या सुद्धा स्वायत्त राहिल्या नाहीत, वृत्तपत्राचे मालक हे कोणा एका व्यक्तीच्या अधीन गेले आहेत. संसदेला टाळ लागल्या आहे, प्रशासन हे गुलामासारखा पायरीवर बसलेला आहे. हे सर्व पाहता  समाजाला आता दिशा देण्याचे काम हे पत्रकारांना करायचे असून पत्रकारांनी आता जे काही सत्य आहे, ते समाजापुढे मांडले पाहिजे,' असे यावेळी राऊत म्हणाले. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष रोहित पवार तर अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख हे होते.

संजय राऊत म्हणाले, 'क्रांतीची ठिणगी ज्या विचारातून पडली, तो पत्रकारांचा विचार आज अशाच पद्धतीने तेवत राहिला पाहिजे,' असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. हे सरकार कसले? ही तर टोळी आहे. टोळीचा एन्काऊंटर होत असतो, जनताच एन्काऊंटर करेल,' असा घाणाघात राज्यसरकार केला.

ते पुढे म्हणाले की, 'आम्ही आणीबाणीचा काळ पाहिला त्यावेळेला एवढे कोणी गुलाम झाले नाही, तेवढे यांच्या कार्यकाळात आता गुलाम होऊ लागलेले आहेत. इंदिरा गांधी समोर कोणी झुकलो नाही, मात्र आता मालक या सत्याधारांसमोर झुकत आहे. आज एका व्यक्तीच्या भोवती हे वृत्तपत्र फिरत आहेत,ही अत्यंत भयंकर बाब आहे. त्यामुळे आपली मान व शान जर टिकवायची असेल, व पत्रकारांची जी परंपरा आहे तीच आपल्याला पुढे न्यायची असेल, तर आपल्याला जे काही सत्य आहे , ते जनतेसमोर मांडलं पाहिजे,' असेही ते म्हणाले.

'अजूनही मी पूर्णवेळ पत्रकार आहे, अजूनही मी अग्रलेख लिहितो.मला मधल्या काळात तुरुंगात पाठवलं, मी जेलमधूनही अग्रलेख लिहित होतो.मी जरी राजकारणात असलो तरी लोकांनी मला पत्रकार म्हणूनच ओळखावं अशीच माझी इच्छा.दिल्ली गेलो तर अजूनही मला सामना वृत्तपत्राचा कार्यकारी संपादक म्हणूनच मला ओळखलं जातं.वृत्तपत्र क्षेत्र केवळ अडचणीत न्हाई तर वृत्तपत्र क्षेत्राच हवन सूरु आहे. पूर्वीच्या काळात पत्रकारांची संख्या खूप कमी होती.पत्रकरांचे नेटवर्क आता गावपातळीपर्यंत पोहचले आहे, त्याचा वापर समाजासाठी व्हावा. ज्याचे हृदय जळतय तोच लिहू शकतो, सध्याची परिस्थिती पाहून त्याच हृदय जळत त्याने स्वतःला पत्रकार समजावे.क्रांती रसाच्या चिळकांड्या कुठून उडू शकतील तर त्या लेखणीततूनच उडू शकतात. 90 टक्के मीडिया हा भांडवलदाराच्या ताब्यात आहेत. या देशात न्यायालय जनतेची राहिली नाहीत, न्यायालयात जनतेला न्याय मिळेल का? याची शंका आहे,' असेही राऊत म्हणाले. 

'ज्याचे हृदय जळते, तोच पत्रकार जनतेचे मत मांडू शकतो, ही वास्तवता आहे. समाज परिवर्तन करण्याची ताकद ही पत्रकारांमध्ये आहे. वर्तमानपत्रांमध्ये  आजही काळ्याचे पांढरं होतं. याच्यावर सर्वांचा विश्वास आहे. तसा माझा पण आहे, म्हणून आज सुद्धा मी लिखाणाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडत असतो. माझा लिहिण्यावर विश्वास आहे, म्हणूनच क्रांतीच्या ठिणग्या जशा लिखाणाच्या माध्यमातून घडल्या गेल्या, तशाच आता सुद्धा पत्रकारांच्या माध्यमातून घडविल्या गेल्या पाहिजेत. पत्रकारांवर हल्ले होतात, हे काही आजचे नाही. ब्रिटिश काळापासून हे हल्ले होत आहेत. देशभरात आत्तापर्यंत बाराशे पत्रकारांना हल्ले झालेले आहेत, ही सुद्धा गंभीर बाब आहे, असेही ते म्हणाले.आज या हुकूमशाहीच्या पुढे मालक लोक सुद्धा काहीच बोलायला तयार नाही. उलट आता यांच्याच मांडीला मांडी लावून हे मालक लोक बसू लागले आहेत. त्यामुळे अनेकांचे फावले गेले आहे. मग पत्रकारांनी आवाज उठवायचा कसा? असा आता प्रश्न निर्माण झाला आहे,' असेही ते म्हणाले.

आमदार रोहित पवार म्हणाले की , 'पत्रकारांच्या अनेक संघटना झाले आहे. संघटना एकत्रितपणे आल्या पाहिजे. भविष्यामध्ये पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. आज या क्षेत्रामध्ये बदल होत चाललेला आहे. पूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये लिखाण्याला स्वातंत्र्य होते. पत्रकारांनी जे जे काही लिहिलं ते जनतेसमोर आणलं, त्यामुळेच या देशांमध्ये बदल घडला हे सुद्धा मान्य केले पाहिजे. त्यामुळे आगामी काळामध्ये सुद्धा पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून तसेच चॅनलच्या माध्यमातून जे काही घडलेलं आहे, ते सत्य जनतेसमोर आणावं व आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये काय आहे, ते सांगावं. जेणेकरून जनतेचे प्रश्न त्या माध्यमातून सुटतील, असे ते म्हणाले. आज मीडियाचे स्वरूप बदलत चाललेले आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियाचा सुद्धा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागलेला आहे. त्यामुळे सहजपणे जनतेपर्यंत पोहोचण्याचे आता माध्यम सुद्धा हे झालेले आहे. एवढे होत असताना कोणत्याही प्रकारे कोणावर अन्याय होणार नाही,याची सुद्धा खबरदारी घेतली पाहिजे. आज राजकारणामध्ये जे जे काही वेगळं चाललेलं आहे, त्या संदर्भात सुद्धा पत्रकार ने लिखाण केलं पाहिजे,' असेही ते म्हणाले . 'आज खरच प्रेस फ्रीडम राहिला आहे का? हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. खऱ्या गोष्टी या लोकांसमोर आणल्या पाहिजे, तरच ही लोकशाही टिकून राहील. तुमचे जे काही प्रश्न आहेत, त्याच्या पाठीशी आम्ही राजकीय मंडळी निश्चितपणे उभे राहू,' अशी ग्वाही सुद्धा पवार यांनी यावेळी दिली.

परिषदेचे अध्यक्ष एस. एम. देशमुख म्हणाले की, 'आज अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही विविध प्रश्न मांडत आहोत. ग्रामीण भागात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही विशेषता भर देत आहोत. पण राज्य शासन या प्रश्न सोडवण्यामध्ये उदासीन आहे. संघटनेने केलेल्या कामातून पत्रकारांच्या कुटुंबांना आधार देण्याचे काम केलं. 60 लाख रुपयांची मदत आम्ही आमच्या संघटनेच्या मार्फत पत्रकारांसाठी  दिलेली आहे,' असेही ते म्हणाले. 'आज पत्रकारांवर हल्ले वाढत चाललेले आहेत. जो काही कायदा केला आहे, त्याचा म्हणावा असा उपयोग होत नाही. भविष्यामध्ये हा कायदा अधिक कडक करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणे गरजेचे आहेत. केंद्र शासनाच्या माध्यमातून खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांच्या बाबतीत रेल्वे प्रवासामध्ये जी सवलत देण्यात आलेली होती, ती बंद करण्यात आलेली आहे, ती तात्काळ सुरू करावी,' अशी आमची मागणी असल्याचे ते म्हणाले. तसेच पत्रकारांना पेन्शन मिळाली पाहिजे, हा प्रामुख्याने मुद्दा आहे, तोही प्रश्न मार्गी लावावा,' असे ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष उषा राऊत यांनीही मनोगत व्यक्त केले. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. गणेश जेवरे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले, तर आभार परिषदेचे अहमदनगर जिल्हा प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी यांनी मानले. यावेळी सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मन्सूरभाई शेख यांचा संजय राऊत व मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष रोहिणी घुले, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख, कोषाध्यक्ष विजय जोशी, राज्य जनसंपर्क प्रमुख अनिल महाजन, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, अहमदनगर प्रेस क्लब चे अध्यक्ष विठ्ठल लांडगे, परिषदेचे दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप कुलकर्णी, जान्हवी पाटील, संयोजन समितीचे गणेश जेवरे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, प्राचार्य डॉ.संजय नगरकर आदी उपस्थित होते.

यंदाचे पुरस्काराचे मानकरी  तालुके पुढील प्रमाणे


नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा

अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती

लातूर विभाग : औढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली

नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव

पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे

कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली

छत्रपती संभाजीनगर विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा छत्रपती संभाजीनगर

कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने