ब्युरो टीम: सध्या स्पर्धेचे युग चालु आहे. विविध
श्रेत्रात अव्वल दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मनुष्य सतत स्पर्धा करत असतो. कधी
सत्ता मिळावी म्हणुन स्पर्धा तर कधी संपत्तीसाठी तर कधी सन्मानासाठी, प्रसिद्धीसाठी
स्पर्धा चालू असते. विविध राष्ट्रामध्ये हि महासत्ता बनण्यासाठी स्पर्धा सुरूच
आहे. प्रत्येक देश इतरांपेक्षा शक्तिशाली बनण्यासाठी अणुबॉम्ब सारखे घातक शस्त्र
बनवताना दिसतात. खरं तर आज जगावर युद्धाचे ढग आलेले दिसतात परंतु युद्धाने प्रचंड
आर्थिक व मनुष्यहानी होवुन खुप नुकसान होऊ शकते. खरं तर आज जगाला युद्धाची नाही तर
गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे.आपण ५ मे रोजी बुध्द पौर्णिमा साजरी करतोय.
त्या निमित्त गौतम बुद्धांच्या कार्यास उजाळा. सिद्धार्थ यांचा जन्म कपिलवस्तू
येथील शाक्य राजघराण्यात झाला होता. सिद्धार्थ जन्मानंतर सात दिवसांनी त्याच्या
आईचे निधन झाले. मावशी गौतमी हिने संभाळ केला म्हणून गौतम हे नाव पडले. आई विना
वाढलेले हेच पोर भविष्यात अनेक पीडितांचे मायबाप बनेल व जगाला दुःख मुक्तीचा मार्ग
दाखवेल असे कोणालाही वाटले नव्हते.राजपुत्र असल्या कारणाने सर्व सुख, ऐश्वर्य होते.
परंतु या राजपुत्राच मन हे ऐश्र्वर्यत,
सुखात व संसारात कंधीच
रमले नाही. जगामधे माझे बांधव हे दुःखाने, दारिद्रयाने पीडीत असताना
मी ते सुख संपत्ती कसा भोगु? या विचाराने गौतम बुद्धाने गृहत्याग केला. सर्व
सुख, संपत्ती यांचा त्याग करून गोरगरिब बांधवाचे दुःख दूर
करण्यासाठी बुध्द वनात, गावागावात फिरू लागले. खडतर तपश्चर्या करून
सत्य ज्ञान मिळवले. लोकांना खरे सत्य ज्ञान सांगून दुःख मुक्तीचा मार्ग दाखवू
लागले. हा महामानव अष्टांग मार्ग, चार आर्यसत्य यातुन तत्वज्ञानाचा प्रसार करू
लागले. लोकांना सत्य, समता, शांती, प्रेम, सदाचार यांचे
महत्त्व आपल्या कृतीद्वारे सांगू लागले. आर्यसत्य द्वारे दु:खाची कारणे व दुःख दुर
करण्याचे उपाय गौतम बुद्धानी लोकांना पटवुन दिले. कर्मकांड, चमत्कार, अंधश्रध्दा, भेदभाव यावर
बुद्धांनी कडाडून हल्ला केला. माणसाला माणूस म्हणून जगता यावे साठी समतेचा प्रसार
त्यांनी बुद्ध धर्माद्वारे केला.प्रत्येक गोष्ट हि स्वताच्या बुद्धीवर तोलून मापून
घ्यावी व मगच त्यावर विश्वास ठेवावा हा वैज्ञानिक दृष्टीकोन सांगणारे बुद्ध हे
महान शास्त्रज्ञच होते. त्यांनी आपल्या अनुयायांना कडक सदाचाराचे नियम घालून दिले
होते.जगामधे आजही बौद्ध धर्माची संख्या भरपुर आहे. आजही जगाच्या कल्याणासाठी शांती, सत्य, अहिंसा याची गरज
भासते. सामाजिक एकता निर्माण करण्यासाठी व समाजातील जातीभेद, धर्मभेद, वंशभेद, प्रांतभेद दूर
करून समता, बंधुता निर्माण करण्यासाठी माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी
गौतम बुद्ध यांचे चरित्र अभ्यासने गरजेचे आहे.आज युवकांच्या हाती दगडे, काठ्या न देता
बुद्ध चरित्र देणे आवश्यक आहे. बुद्धांचे विचार हेच सुखी जीवनाचे खरे सुञ आहे.
महेंद्र मिसाळ - (हे प्रसिद्ध वक्ते व लेखक आहेत.)
९८५०३९२४१४
टिप्पणी पोस्ट करा