ब्युरो टीम: कर्नाटकात सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाची
सत्ता जाताना दिसत आहे. तर काँग्रेस बहुमताच्या जवळ जाताना दिसत असून बहुमत मात्र
मिळताना दिसत नाहीय.
यामुळे निजद पुन्हा एकदा
भाव खाऊन जाणार आहे. परंतू, यावेळी निजदच्या
नेत्यांना आपल्या गोटात घेण्यासाठी पुन्हा एकदा भाजपाने प्रयत्न सुरु केले आहेत.
कर्नाटकात पुन्हा एकदा
सत्तेचे राजकारण रंगणार आहे. गेल्यावेळी देखील जनतेने भाजपाला सत्तेपासून दूर
ठेवले होते. यामुळे काँग्रेसने आणि निजदने सत्ता स्थापन केली होती. निजदचे
कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. परंतू कुमारस्वामींना काँग्रेसच्या नेत्यांनी
भरपूर त्रास दिला होता. एका कार्यक्रमात कुमारस्वामी रडले होते. यानंतर भाजपाने
निजद व काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता उलथवली होती.
आताही तशीच परिस्थिती
निर्माण होण्याचे दिसत आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला ७८, काँग्रेसला ११५, निजदला २६ आणि इतरांना ५ अशी आघाडी मिळाली आहे. अद्याप
एकाही जागेचा निकाल हाती आलेला नाही. पुढील अर्धा एक तास कर्नाटकच्या राजकारणाला
कलाटणी देणारा ठरू शकतो.
या सुरुवातीच्या कलांवरून
काँग्रेसने हालचाली करण्यास सुरुवात केली असून जे उमेदवार आघाडीवर आहेत ते विजयी
झाल्यास त्यांना लागलीच बंगळुरुला आणण्याची तयारी सुरु केली आहे. या आमदारांना
गेल्यावेळेप्रमाणेच हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे. यासाठी हैदराबादमध्ये रिसॉर्ट बुक
केल्याची माहिती आहे. य़ा रणनितीसाठी काँग्रेसने आज दुपारी १२ वाजता विधिमंडळ
पक्षाची बैठक बोलावली आहे. यामध्ये गरज लागलीच तर जेडीएसशी हातमिळवणी करण्याची ही
चर्चा करण्यात येणार आहे.
कुमारस्वामी कालच
सिंगापूरला निघून गेले आहेत. यामुळे त्यांच्याशी लागलीच संपर्क साधणे काँग्रेसला
कठीण जाणार आहे. अशातच भाजपाने कुमारस्वामींशी संपर्क साधल्याचे समोर येत आहे.
टिप्पणी पोस्ट करा