Keshavupadhye: सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीची विसर्जनाकडे वाटचाल भाजपाचा टोला



ब्युरो टीम:  सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला सत्ता गेल्यामुळे घरघर लागली आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांआधी मोठा भाऊ कोण याचे दावे सुरु झाल्याने महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे सुरु झाली आहे असा टोला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी केशव उपाध्ये यांनी सांगितले की, केवळ सत्तेसाठीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते. सत्ता गेल्यानंतर या पक्षांमध्ये कलगी तुरा रंगला आहे. राष्ट्रवादीने आघाडीत आपणच मोठा भाऊ असल्याचा दावा केला आहे. अधिकृत पक्ष नसलेल्या पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आपल्यामागे किती माणसे आहेत हे न मोजताच लोकसभेच्या १९ जागांवर दावा करू लागले आहेत. कोणत्या आधारावर आपण १९ जागा मागत आहोत हे संजय राऊत यांनी सांगावे असं उपाध्येंनी म्हटलं.

तसेच सत्तेतून गेल्यावर जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी कोणाची ताकद जास्त हे सांगण्यातच आघाडीचे तिन्ही पक्ष आपली ताकद खर्च करत आहेत. एकमेकांच्या आधाराशिवाय आपण टिकू शकत नाही हे या तिन्ही पक्षांना ठाऊक आहे. जिवंत राहण्यासाठी एकमेकांमध्येच स्पर्धा सुरु झाल्याने या आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे चालू आहे असंही केशव उपाध्ये म्हणाले.

दरम्यान, पूर्वी एखाद्या सरकारी यंत्रणेने चौकशीसाठी बोलावले की, राजकीय नेत्यांना त्याचा गवगवा होऊ नसे असे वाटायचे . मात्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अंमलबजावणी संचालनाच्या चौकशीला जाताना आपण मोठे शौर्य केल्याचा आविर्भाव आणलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची मानसिकताच यातून स्पष्ट झाली आहे असंही भाजपाने म्हटलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने