Radhakrishna Vikhe Patil : तर त्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणार, मंत्री विखे पाटलांचे वक्तव्य



ब्युरो टीम : 'निळवंडे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कालव्याची काम ठेकेदारांनी निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याची आवश्यकता आहे. मात्र कामामध्ये जाणीवपुर्वक हलगर्जीपणा करणाऱ्या, तसेत काम वेळेत न करणाऱ्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येईल,' असे सुतोवाच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

विखे पाटील यांनी सलग दुसऱ्या दिवशी राहाता आणि संगमनेर तालुक्यातील निळवंडे कालव्यांच्या कामांची पाहाणी केली. संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी, मनोली, घुलेवाडी, कुरण, खांजापूर, निळवंडे कौठे, कमळेश्वर, गोगलगाव, आडगाव, मापारवाडी, लोणी खुर्द, बाभळेश्वर, पिंप्री निर्मळ, वाकडी आदी गावात कालव्यांच्या सुरू असलेल्या कामाची पाहाणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि अडचणी समजून घेतल्या. महसूल जलसंपदा विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी या पाहाणी दोऱ्यात सहभागी झाले होते.

'बहतांशी गावात कालव्यांची काम घेतलेल्या ठेकेदारांनी अर्धवट केली आहेत. अनेक ठिकाणी काम अद्यापही सुरू नाहीत. या कामाचा ठेका घेतलेल्या कंपनीने मुदतवाढ घेतली, तरीही कामाची परिस्थीती जैसे थे असल्याचे दिसून आले. यासंदर्भात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेवून प्रलंबित काम वेळेत पूर्ण  करण्याच्या दृष्टीने निर्णय करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

अनेक ठेकेदारांनी राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेवून घेतलेली काम पूर्ण करत नसल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी मंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिल्या. याबाबत विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांकडे स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त करून अशा ठेकेदारांना पाठीशी घालून त्यांना कामाकरीता मुदतवाढ का देता? असा सवालही त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. या प्रकल्पात ठेकेदार अडथळे निर्माण करणार असतील, तर त्यांना काळ्या यादीत टाकण्याबाबत निर्णय करण्याचे सुतोवाच त्यांनी केले. निळवंडे कालव्यांची काम पूर्ण करण्यासाठी विभागाने नियोजन करावे,कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी होणार असल्याने कालव्यांची काम वेगाने पूर्ण करण्यासाठी  प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने