The kerala story ftii: 'द केरळ स्टोरी'च्या प्रदर्शनानंतर दहशतवादाचा संबंध धर्माशी जोडण्याचा प्रयत्न



बहुचर्चित चित्रपटाच्या निर्मात्यांची पुण्यात स्क्रिनिंगदरम्यान खंत 

ब्युरो टीम : दहशतवादाला कोणताही धर्म नसतो, असे आम्हाला दीर्घ काळापासून सांगण्यात आणि शिकवण्यात आले आहे. पण जेव्हा आम्ही आमच्या चित्रपटातून दहशतवादाच्या नेटवर्कचे  चित्रण केले तेव्हा काही घटकांनी त्याचा संबंध धर्माशी जोडला. हे खेदजनक आहे, अशी खंत 'द केरळ स्टोरी' या बहुचर्चित चित्रपटाच्या विपुल शाह आणि सुदीप्तो सेन या निर्माता-दिग्दर्शक जोडीने व्यक्त केली. 

बॉक्स ऑफिसवर लोकप्रिय ठरलेल्या आणि चर्चा निर्माण करणाऱ्या या सिनेमाचे खास स्क्रिनिंग पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीटयूट ऑफ इंडिया (FTII) येथे शनिवारी मिती फिल्म सोसायटीतर्फे आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर या दोघांनी निमंत्रित प्रेक्षकांशी संवाद साधला आणि चित्रपटाच्या निर्मिती दरम्यान आणि नंतरचे अनुभव कथन केले. 

हा चित्रपट काढण्यामागचा हेतू सांगताना विपुल शाह म्हणाले, “हा चित्रपट बनवणे हे माझे कर्तव्य होते. जेव्हा आम्ही हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी दिग्दर्शक सुदीप्तो सेनला सांगितले की त्यात कुठलीही मखलाशी असता कामा नये. सत्य हे कितीही क्रूर असले तरी सांगायलाच हवे. देशातील संपूर्ण जनता आमच्या मागे असताना घाबरण्याचा प्रश्नच नव्हता.“

दिग्दर्शक सेन म्हणाले, “या चित्रपटाने देशभरात खूप चर्चा आणि वाद निर्माण केला आहे, याचा मला आनंद आहे. चित्रपटात जे दाखवले आहे ते भयानक आणि त्रासदायक आहे, पण आमचे काम लोकांना घाबरवण्याचे नव्हते. लोकांमध्ये माहिती व विचार रुजवणे हा आमचा उद्देश होता.”

`द केरळ स्टोरी` हा एक प्रचारकी चित्रपट असल्याच्या काही मंडळींनी घेतलेल्या आक्षेपाबद्दल विचारले असता, या दोघांनी एकसुरात उत्तर दिले की या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.  तो नव-नवे विक्रम रचत आहे आणि या आकड्यांद्वारे लोकांनीच हा प्रचारकी चित्रपट असल्याच्या आक्षेपांना मोठ्या संख्येने उत्तर दिले आहे.  या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचा प्रयत्न करणारे १५ खटले आम्ही न्यायालयात लढले आहेत आणि ते सर्व आम्ही जिंकलो आहोत."

इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेने केरळमधील महिलांना धर्मांतर करण्यास भाग पाडून त्यांची या संघटनेत भरती कशी केली, याचे चित्रण द केरळ स्टोरीमध्ये करण्यात आले आहे. विपुल शाह यांच्या सनशाइन पिक्चर्सने याची निर्मिती केली आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेल्या समस्येवरील उपाय विचारला असता सेन म्हणाले, की हा एक गुंतागुंतीचा प्रश्न आहे. आपली शिक्षणपद्धती जुनी असून ती ब्रिटिशांनी स्वतःच्या हितासाठी निर्माण केलेली आहे. आपली न्यायव्यवस्था हीसुद्धा चिंतेचा विषय आहे. या मुद्द्यांवर खूप चर्चा होणे आवश्यक आहे. चित्रपटात दाखविण्यात आलेले संकट टाळण्याच्या दृष्टीने, वैयक्तिक पातळीवर, सर्वात महत्त्वाचा घटक हा  कुटुंब आहे. नेहमी कुटुंबाशी जोडलेले राहा आणि कुटुंबातील सदस्यांशी चांगला संवाद साधा.

*विद्यार्थ्यांचा गोंधळाचा प्रयत्न*

चित्रपटाचे स्क्रीनिंग सुरू असताना एफटीआयआयच्या काही विद्यार्थ्यांनी कार्यक्रमस्थळी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनी याआधी स्क्रीनिंगच्या विरोधात आंदोलन पुकारले होते पण नंतर त्यांनी थिएटरवर मोर्चा काढला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली. मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद लेले म्हणाले की, विद्यार्थ्यांचा हा आक्रमकपणा पूर्णपणे चुकीचा होता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कल्पनेच्या विरोधात होता. मिती फिल्म सोसायटी या वर्तनाचा निषेध करते आणि शांततापूर्ण संवाद आणि विचारांच्या प्रसारावर विश्वास व्यक्त करते.  मिती फिल्म सोसायटीच्या पुढाकारामुळेच चित्रपटाचे दिग्दर्शक आणि इतर क्रू मेंबर्सचा आंदोलक विद्यार्थ्यांशी शांततापूर्ण संवाद झाला, हेही येथे उल्लेखनीय आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने