Navi mumbai airport : नवी मुंबई विमानतळला पुढील वर्षाचा मुहूर्त? मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली पाहणी

 

 

ब्युरो टीम : नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ केवळ राज्याच्या नव्हे तर देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे विमानतळ ठरणार आहे. त्याच्या मार्गातील अडचणी दूर करून ते नियोजित २०२४ मध्ये वेळेत वाहतुकीसाठी खुले होण्यासाठी राज्य शासन आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी सकाळी केले. 

उलवे येथील विमानतळाच्या हेलिकॉप्टरद्वारे पाहणीनंतर, अदानी समूहाने सादरीकरण केले. त्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, खा. श्रीरंग बारणे, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, आ. महेश बालदी, मंदा म्हात्रे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे (एमएमआरडीए) आयुक्त संजय मुखर्जी, विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सिडकोचे सहसंचालक कैलास शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, नवी मुंबई पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, पनवेल पालिका आयुक्त गणेश देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळ हे पुणे, मुंबई, गोवा यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विमानतळाचे भूमिपूजन झाले होते. उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते होईल. विमानतळ उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प लवकरच लोकांसाठी खुला होईल, यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत” असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

नवी मुंबई विमानतळाचे काम अतिशय वेगाने सुरू असल्याचे सांगून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २०२४ पर्यंत ते सुरू करण्याच्या दृष्टीने विमानतळाच्या कामात येणाऱ्या अडचणी सोडवून कामाला अधिक गती द्यावी, हा आजच्या पाहणीचा उद्देश आहे. 

विविध दळणवळणाची साधने या विमानतळाला जोडण्यात येणार असल्याने ते देशातील अद्वितीय असे विमानतळ म्हणून गणले जाईल. विमानतळाच्या कामाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॅलीकॉप्टरद्वारे पाहणी केली. यावेळी एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जीही उपस्थित होते. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी धावपट्टीचीही पाहणी केली.

दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील २२ किलोमीटरच्या सिलिंक महत्त्वाचा दुवा ठरेल. दरवर्षी ९ कोटी प्रवासी वाहतूक होईल. म्हणूनच मोठ्या शहरासाठी हा प्रकल्प लोकांना दिलासा देणारा आहे. याची क्षमता वाढविण्यासाठी विविध परवानग्या मिळविण्याची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. पहिल्या टप्प्यात चार टर्मिनल असून ४२ विमाने उभी राहतील. ५,५०० क्षमतेचे कार पार्किंग असेल. हे विमानतळ ११.४ किलोमीटर परिसरात उभे राहत असून दोन धावपट्ट्या असतील.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने