Raigad Landslide : इरशाळवाडी येथील बचावकार्य कायमस्वरूपी थांबाविले, कारण...



ब्युरो टीम : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडी येथे कोसळलेल्या दरडीखाली अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. परंतु, चार दिवसांच्या शोधमोहिमेनंतर रविवारी सायंकाळपासून बचावकार्य थांबवण्यात आले आहे. मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली.

'इर्शाळवाडी  दुर्घटनेतून बचावलेल्या १४४ लोकांच्या पाठिशी शासन ताकदीने उभे आहे. या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येणार आहे. याबरोबरच जिल्हातील अन्य धोकादायक वाड्या आणि गावांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत,' असे सांगतानाच उदय सामंत म्हणाले, '१९ जुलै पासुन सुरु असलेली बचाव कार्य मोहीम २३ जुलै रोजी सायंकाळी ५.३० पासून थांबविण्यात येत आहे. १९ जुलै  रोजी इरर्शाळवाडी या ठिकाणी दरड कोसळल्याने या आदिवासीवाडीतील ४३ घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली असून इरर्शाळवाडीतील २२८ इतकी लोकसंख्या होती.  यापैकी या दुर्घटनेत २७ लोक मृत्यूमुखी, ५७ लोक बेपत्ता असून १४४ लोक हयात आहेत. या हयात असलेल्या लोकांचे तात्पुरत्या जागेत पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच त्यांना लागणाऱ्या सर्व सोयी-सुविधा शासनाकडून पुरविण्यात आल्या आहेत. या कुटुंबाचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जागा निश्चित करून सिडको मार्फत सदर जागेचा विकास करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. तसेच आ.महेश बालदी यांनी विधानसभेत आयुधाद्वारे दिलेल्या माहितीनुसार ५ वाड्यांचे आणि जिल्ह्यातील २० धोकादायक गावांचे पुनर्वसन करण्याबाबत शासन सकारात्मक आहे,' असेही सामंत यांनी सांगितले.

'या दुर्घटनेच्या ठिकाणी बचाव कार्यासाठी एनडीआरएफ, टीडीआरएफर, इमॅजिका कामगार, सिडकोचे कर्मचारी तसेच इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनधी असे एकूण जवळपास १ हजार १०० लोकांनी उत्तमरित्या कामे केले, त्यांचे शासनामार्फत आभार मानले. भविष्यात अशी दुर्देवी घटना घडू नये म्हणून शासन व जिल्हा प्रशासन खबरदारी घेईन, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने