Rain Update : पावसाचा जोर वाढला, पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी, नागरिकांना सतर्कतेचा इशारा



ब्युरो टीम : राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर वाढला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाने जोर धरला असून पंचगंगा नदीने पहाटे तीन वाजता इशारा पातळी गाठली आहे. आता ती धोका पातळीकडे हळूहळू सरकत असल्याने  नागरिकांना सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या धुवाँधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीने मध्यरात्री ३९ फुटांची इशारा पातळी गाठली असून, धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर, प्रयाग चिखली व आंबेवाडी गावातील लोकांचे स्थलांतर सुरू केले आहे. राधानगरी धरण ८५ टक्के भरले असून, सध्या १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पुराचे पाणी आल्यामुळे शिवाजी पूल – गंगावेश रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत सुतारवाडा, उलपे मळा, कसबा बावडा येथील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने