ब्युरो टीम: विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या शिष्टमंडळाने विद्वयापीठामधील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात मा. कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेतली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विभागात प्रवेश निश्चित झालेल्या अनेक गरजू विद्यार्थ्यांना अजूनही वसतिग्रह मिळालेले नाहीत. प्रत्येक गरजू विद्यार्थ्यांला वसतिग्रह मिळाले पाहिजे ही आमची मागणी आहे. परंतु सध्या ठराविक काही मोजक्याच विद्यार्थ्यांनाच वसतिग्रह दिले जात आहे. ही बाब अत्यंत अन्यायकारक असून यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, बहुजनांच्या मुलांना वसतिग्रह अभावी आपले प्रवेश रद्द करण्याची वेळ या वसतिग्रह कार्यालय व विद्यापीठ प्रशासनाने आणली आहे. आणि ही परिस्थिती अशीच चालू राहिली तर लवकरच विद्यापीठामधील काही विभाग बंद पडतील.
वसतिगृह कार्यालयाने वसतिग्रह संबंधित जो कोटा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये अनेक चुका आहेत. अनेक वंचित घटकांना, समूहांना जागा दिलेल्या नाहीत. ही बाब कुलगुरू यांच्या लक्षात आणून दिली. वसतिगृहप्रमुख विद्यार्थीचे फोन घेत नाहीत. ते कार्यालयात देखील उपलब्ध नसतात. इतर कर्मचारी देखील विद्यार्थीशी गैरवर्तन करतात. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने मा. कुलगुरू यांना नम्र विनंती केली आहे की त्यांनी तात्काळ सर्व गरजू विद्यार्थ्यांना वसतिग्रह उपलब्ध करून द्यावे. तसेच वसतिग्रहामधील बंद पडलेली Wi-Fi सुविधा तात्काळ सुरू करावी. या चर्चेदरम्यान व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर सर हे देखील उपलब्ध होते. कुलगुरू यांनी वसतिग्रह प्रश्नांवरती विद्यार्थी हिताचा निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे. येत्या काही दिवसांत हे दोन्ही प्रश्न सुटले नाही तर कृती समिती व इतर समविचारी संघटनांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा