Chandrashekhar Banvankule: कमळाच्या चिन्हावर लोकसभा लढवा अन्यथा वेगळा विचार करू; चंद्रशेखर बावनकुळे यांचा नवनीत राणा यांना इशारा

 

ब्युरो टीम:आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वच पक्षांना लागले आहेत. त्यातच तगडा उमेदवार आपल्या बाजूने लढावा असे प्रत्येक पक्षाला वाटत असते त्याच प्रमाणे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याविषयी भाजपकडून महत्वाचे विधान करण्यात आले आहे.

खासदार नवनीत राणा यांनी 2024 सालची निवडणूक ही भाजपच्या कमळ या चिन्हावर लढावी, त्यांनी तसं नाही केलं तर मग आम्ही वेगळा विचार करू असं सूचक वक्तव्य भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावती दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केले आहे. आता बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा काय भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘जर नवनीत राणा यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक कमळावर नाही लढवली तर तो त्यांचा निर्णय आहे. मग आम्ही वेगळा विचार करू. आमची सगळ्यांची भावना आहे की नवनीत राणा यांनी कमळ चिन्हावर 2024 ची लोकसभा निवडणूक लढवावी. आम्ही त्यांना विनंती करू. पण त्यांचा एनडीएमध्ये सहभाग असल्याने याबाबत केंद्रीय पार्लमेट्री बोर्ड निर्णय घेईल.’ असे म्हटले आहे.


तसेच पुढे बोलताना, खासदार नवनीत राणा यांनी जर त्यांच्या स्वाभिमानी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ असं बावनकुळे म्हणाले. अमरावतीचा खासदार हा भाजपचाच व्हावा अशी लोकांची मानसिकता असल्याचेही ते म्हणाले.

युवा स्वाभिमानी पक्षाच्या नवनीत राणा यांनी 2019 सालची निवडणूक ही अपक्ष म्हणून लढवली होती आणि जिंकली होती. त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता. गेल्या दोन निवडणुकीवेळी नवनीत राणा यांना राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळाला होता. त्या जोरावर त्यांनी दोनदा निवडणूक लढली. मधल्या काळात राजकारणात बराच गोंधळ उडाला आहे आणि खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी भाजपची कास धरली. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांमध्ये आमदार रवी राणा यांचा समावेश झाला. त्यामुळे अमरावतीमध्ये त्यांची ताकद वाढली.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर राणा दाम्पत्याने थेट उद्धव ठाकरेंशी पंगा घेतला आणि उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून चांगलेच घेरले. उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर त्यांनी हनुमान चालिसा पठण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊन त्यांना 14 दिवस तुरुंगात जावे लागले होते. तुरुंगातून आल्यानंतरही त्यांनी शिवसेनेला त्यांचा विरोध कायम ठेवला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने