ब्युरो टीम : भारतीय क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मनोज तिवारी याने निवृत्तीची घोषणा केली आहे. तो क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त झाला आहे.मनोजने सोशल मीडियाद्वारे ही माहिती दिली आहे. या निवृत्तीमुळे तो क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे.
मनोज तिवारी याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 12 वनडे आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले होते. त्याने भारताकडून अखेरचा सामना 2015मध्ये खेळला होता. त्यानंतर तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळत होता. त्याची देशांतर्गत कारकीर्द कौतुकास्पद राहिली आहे. विशेष म्हणजे, तो बंगालचा क्रीडा मंत्री देखील आहे.
मनोज तिवारी याची पोस्ट
मनोज तिवारी (Manoj Tiwary) याने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो भारतीय संघाच्या जर्सीत दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने फक्त "थँक्यू" म्हणजेच "धन्यवाद" असे लिहिले आहे. त्याच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते त्याला भविष्यासाठी शुभेच्छाही देत आहेत.
एका युजरने कमेंट करत लिहिले की, "सर्वात प्रतिभावान आणि अनलकी खेळाडू." आणखी एकाने लिहिले की, "अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा." एकाने असेही लिहिले की, "देशासाठी दिलेल्या योगदानासाठी खूप खूप धन्यवाद. तुझ्या भविष्यासाठी शुभेच्छा."
मनोज तिवारीची कारकीर्द
मनोज तिवारी याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याला भारताकडून फार सामन्यात संधी मिळाली नाही. त्याने 12 वनडे सामने आणि 3 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 26.09च्या सरासरीने 287 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 शतकाचा समावेश आहे. तसेच, त्याने टी20त फक्त 15 धावा केल्या आहेत. याव्यतिरिक्त त्याची देशांतर्गत आकडेवारी चांगली राहिली आहे. त्याने 141 प्रथम श्रेणी सामन्यात 48.56च्या सरासरीने 9908 धावा केल्या आहेत. यामध्ये 29 शतके आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे.
टिप्पणी पोस्ट करा