Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या गटाला केंद्रात मंत्रिपद ? शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता ?

ब्युरो टीम : राज्य मंत्री मंडळाचा आणखी एक विस्तार घटस्थापनेनंतर  होण्याची शक्यता असल्याची माहिती वरिष्ठ विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. यंदाच्या मंत्री मंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आणखी आमदारांना संधी मिळणार असून कॅबिनेटमध्ये आणखी मंत्र्यांची भर पडणार आहे. आगामी मंत्रीमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पदे आणि केंद्रात देखील एक कॅबिनेट पद अजित पवार गटाच्या वाट्याला येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची अपेक्षा लावून बसले आहेत. दरम्यान असे असतानाच अजित पवारांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपशी हातमिळवणी करत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुसऱ्यांदा झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादीच्या 9 आमदारांना मंत्रीपद मिळाले आहेत. तर राष्ट्रवादीच्या एन्ट्रीमुळे शिंदे गटाच्या आमदारांच्या मंत्रीपदाच्या अपेक्षेवर पाणी फिरले. त्यातच आता लवकरच पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याचा दावा केला जात असून, ज्यात पुन्हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. सत्तेत सहभागी होतानाच अजित पवार यांना आश्वासन  दिल्याची माहिती एबीपी माझाला वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्तार घटस्थापनेनंतर देखील रखडल्यास अधिवेशनापूर्वी कोणत्याही परिस्थितीत करण्याचा सरकारचा मानस आहे. 

महायुतीत अजित पवार गटाचा वरचष्मा

राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील अजित पवार हे अनुपस्थित होते.  त्यामुळे त्याच्या नाराजीची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. नाराजी नाट्यानंतर अजित पवारांनी तब्बल सात मंत्र्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं आहे. आता मंत्रीमंडळ विस्तार झाला तर त्यामध्ये देखील  अजित पवार गटाचा वरचष्मा पाहायला मिळत आहे. 

शिंदे गटाची नाराजी पुन्हा एकदा वाढणार

 अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर शिंदे गटाकडून सातत्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली, अशी स्थिती मुख्यमंत्री शिंदे गटाची राहिली आहे.  शिवसेना-भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेचा मुख्यमंत्री झाला पण नऊ मंत्र्यांनी म्हणावी तशी खाती देण्यात आली नव्हती. यावरून भाजपने फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच खूश करून बाकीच्यांची बोळवण केल्याचीही चर्चा होती. वर्षभरापासून सेनेच्या उर्वरित इच्छुकांना रोज मंत्रिपदाची शपथ घेतातानाची स्वप्ने पडतात. अजित पवार सत्तेत आल्यानंतर आधीच वैतागलेल्या शिंदे गटाला रोज नवीन धक्के बसत आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकार सुरळीत सुरू असताना ते भाजपकडे आले... पण त्यांना मंत्रिपदासाठी झुलवत ठेवण्यात आलं. नंतर आलेल्या अजित पवार गटाला मात्र एका दमात नऊ मलईदार मंत्रिपदं देण्यात आली. एकंदरीत  शिंदे गटाची नाराजी दिवसेंदिवस वाढत आहे. आता मंत्रीमंडळ विस्तारात देखील अजित पवर गटाला प्राधान्य मिळत असल्याने पुन्हा शिंदे गटाची नाराजी पुन्हा एकदा वाढत जाण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने