Manoj Jarange patil : ‘तुम्हाला लोकांमध्ये भांडण लावून दिल्याशिवाय जमतच नाही’: मनोज जरांगे

ब्युरो टीम : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. बीडमध्ये मराठा आंदोलकांनी काल जाळपोळ केली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून जाळपोळ करणाऱ्यांना विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल होईल, असा इशारा दिला होता. देवेंद्र फडणवीस यांनी केसेस दाखल करण्याबाबत केलेल्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी सडकून टीका केली. “देवेंद्र फडणवीस यांना आयुष्यात दुसरं काय आलं? एवढंच आलं. यांनी उभ्या आयुष्याच एवढंच केलं. कोण टार्गेट केलं आणि कुणी कुणाची घरे जाळली, कशाला बोलगा मग आम्हाला? ती कुणी जाळली, मराठ्यांनी जाळली की दुसरं कुणी जाळलं? तुमचेच लोकं घुशविता आणि तुम्हीच जाळीता. तुम्ही आम्हाला शिकविता”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘बासुंद्या खाय, गुलाबजामून खाय, फुकट खायचं’

“भाजप तुमच्यामुळेच संपायला लागली आहे ना मग, कशामुळे संपायला लागली आहे? रिवाज कशामुळे इतक्या राज्यात आलेत? हे असले नमुने आहेत ना बढाया हाणणारे. निधी आमचा आहे. कर आमच्या जनतेचा आहे. फुकटचे पैसे खायचे. बासुंद्या खाय, गुलाबजामून खाय. फुकट खायचं, आता सूचना. उगाच बोलायचं की कलम 307 लागू करायचं. तुम्ही राज्यात अशांतता पसरवायचं ठरवलं आहे तर करा तुम्हाला काय करायचं ते. आमचा मराठ्यांचा नाईलाज आहे. आम्ही उद्या संध्याकाळपर्यंत वाट पाहू. नाहीतर पाणी सोडणार. आमचं आंदोलन शांततेत करु. तुम्ही किती ताकदार आहात, किती गुन्हे दाखल करतात ते आम्हाला बघायचं आहे”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘आमच्याकडे दांडकं घेऊन येत असाल तर…’

“सरकारला दुसरं काय कामच आहे? हे असे बांगड्या भरल्यागत चाळे करायचे. यांच्या हातात बांगड्या पाहिजे होत्या. हे मर्दासारखं चालवतच नाहीत. आतून काड्या करतात. सरळ सांगायचं, कुठे नेट बंद करता तर कुठे काय बंद कर. आमच्या अंगावर यायचा प्रयत्न केला, तुम्ही आमच्याकडे दांडकं घेऊन येत असाल तर आम्हालासुद्धा मर्यादा आहेत. आम्हाला आमच्या मर्यादा सोडाव्या लागणार आहेत आणि याला जबादार दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री असणार आहेत. त्यातला एक उपमुख्यमंत्री तर जास्त जबाबदार राहणार आहे. कारण त्याला असल्या काड्या करायची लयी सवय आहे”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

आम्ही शांततेत आहोत. पण आम्ही वस्ताद आहोत. आम्ही ओबीसी नेत्यांच्या धमक्यांना घाबरायला तयार नाहीत. आमचं खाल्लं तोवर गोड लागायचं. आता द्यायची वेळ आली तर म्हणतो रस्त्यावर येईल. ये तर रस्त्यावर. तुला कोणत्या सरकारची फूस आहे. एक उपमुख्यमंत्री लयी कलाकार आहे. त्याच्याकडे बघावं लागेल. बाळा तू लोकांना थांबव. तू राज्य बिघडवू नको. एकतर सर्व भाजप विद्रुप केलं. सरकारमध्ये रंगेबिरंग आणून ठेवले आहेत, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘तुम्हाला लोकांमध्ये भांडण लावून दिल्याशिवाय जमतच नाही’

आम्ही कालपर्यंत तुमचा आदर करत होतो. तुम्ही समाजाच्याबाबत व्यवस्थित निर्णय घ्या. कायदा-सुव्यवस्था बिघडवू नका. तुमचा गुणच आहे. तुम्हाला लोकांमध्ये भांडण लावून दिल्याशिवाय जमतच नाही. इतके खोडी आहेत. मी ओबीसी बांधवाना जाहीर सांगतो. तुम्ही विनाकारण यांचं ऐकून रस्त्यावर येऊ नका. मराठे येणार नाहीत. यांचा पहिल्यापासून इतिहास आहे. यांनी गोरगरिबांना पहिल्यापासून एकमेकांच्या विरोधात झुंजायला लावलंय. यांचा पहिल्यापासून इतिहास आहे. हे घरात बसून मलिदा खातात. यावेळी उलटं होणार आहे. यांनी ओबीसी आणि मराठ्यांमध्ये झुंज लावली तर यांना घरातच बसू द्यायचं नाही. जो मजा बघतो त्याच्याच मागे लागायचं, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘असं वागल्यावर काय घंट्याचं मोदी परत पंतप्रधान होतील’

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देवेंद्र फडणीस यांना फोन करुन महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय. याबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता “मला फोन करा. मी सांगतो काय परिस्थिती आहे. ते कधी सांगणार नाहीत. त्या माणसावर काल आमची माया आली होती. पण केसशिवाय दुसरं काही बोलतच नाही. आमच्याविरोधात केस केले. आता परत केस करायचं बोलत आहेत. दुसरं काहीच येत नाही का?”, असा सवाल मनोज जरांगे यांनी केला.

“मार्ग काढू, चर्चा करु, असं बोलता येत नाही. राज्य चालवायला निघाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डबल पंतप्रधान होतील, असं स्वप्न बघत आहेत. असं वागल्यावर काय घंट्याचं होतील का? एवढ्या मोठ्या नेत्याने काय बोलावं, केसेस शिवाय काही बोलतच नाहीत. आमच्या मराठ्यांच्या डोक्यावर जेवढे केस आहेत तेवढे केसेस आहेत. अमित शाहांनी इतर सर्वांना सोडून दिलं आणि त्यांनाच फोन करतात. त्यांच्याकडे काय आहे. त्यांनी सर्व इचको करुन ठेवलाय. तुमचाही इचको होईल. मग तुम्हाला घरी जावं लागेल”, असं मनोज जरांगे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने