Agadgoan : आगडगावमध्ये रविवारी अडीच हजार किलो अंब्याचा आमरस

 

ब्युरो टीम : नगर तालुक्यातील आगडगाव येथील श्री काळ भैरवनाथ देवस्थानाजवळ येत्या रविवारी (ता. २६ मे) आमरसाचा महाप्रसाद दिला जाणार आहे. या वेळी अडीच हजार किलो आंब्यांचा वापर केला जाईल. सुमारे दहा ते १५ हजार भाविक याचा लाभ घेतील, असे देवस्थानाच्या वतीने सांगण्यात आले.

देवस्थानतर्फे दरवर्षी असा उपक्रम राबविला जातो. मागील वर्षी दीड हजार किलो आंब्यांचा रस करण्यात आला होता. त्यासाठी खास मशिनचा वापर करण्यात येतो. या महाप्रसादासाठी भाविक वर्षभरापासून नोंदणी करून ठेवतात. चांगल्या दर्जाच्या आंब्याच्या खरेदीसाठी नियोजन केले जाते. रविवारी होणाऱ्या या उपक्रमादरम्यान सकाळी ११ वाजता अभिषेक होतो. अन्नदात्यांची मंदिराला प्रदक्षिणा होते. १२ वाजता महाआरती सुरू होते. त्यानंतर महाप्रसादास प्रारंभ होतो. दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत अन्नदान सुरू असते. त्यासाठी अन्नछत्रालय, सांस्कृतिक भवन तसेच प्रांगणात गरजेनुसार पंगती बसविल्या जातील. त्यामुळे भाविकांना चांगली सेवा देता येईल. रविवारी नगरच्या बसस्थानकावरून जादा एसटी बसची व्यवस्था करण्यात येते. तसेच देवस्थानच्या दोन बसही सेवेत असतात.

कोकणातील आंब्यांबरोबरच काही गावरान आंब्याचाही वापर आमरसामध्ये केला जातो. आंब्याच्या बागा असलेले अनेक शेतकरी आपल्या बागेतील पहिला आंबा देवाच्या चरणी अर्पण करतात. अन्नदानाच्या उपक्रमाच्या दिवशी आवर्जुन काही आंबे पाठवितात. त्यांचाही या उपक्रमात सहभाग करून घेतला जातो. यंत्राच्या साह्याने आंब्याचा रस काढला जातो. सर्व अन्न हायजेनिक पद्धतीने करण्याचे नियोजन असते

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने