Kalyan Loksabha : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरोधातील उमेदवार ठाकरे गट बदलणार? चर्चांना उधान

 

ब्युरो टीम : कल्याण लोकसभा मतदार संघात मोठी घडामोडी घडली आहे. ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांचे नाव जाहीर झाले होते. त्या महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांना टक्कर देणार होत्या. त्याचवेळी कल्याणमधून शिवसेना ठाकरे गटाकडून आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. माजी महापौर रमेश जाधव यांच्याकडून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर शनिवारी शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. ठाकरे गट 6 मे रोजी एबी फॉर्म बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे विरोधातील उमेदवार ठाकरे गट बदलणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

उद्धव सेनेचे उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह रमेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरला आहे. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची प्रतिक्षा आहे. उद्धव ठाकरे काय भूमिका मांडणार कल्याणचा उमेदवार कोणाला करणार याकडे लागले सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे यांच्या शिवसेनेतून दोन उमेदवारी अर्ज आल्यामुळे कल्याणची रणनीती ठाकरे गट बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

विरोधकांची ठाकरे गटावर टीका

कल्याणमध्ये दुसरा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर महायुतीला ठाकरे यांच्या शिवसेनेवर टीका करण्याची संधी मिळाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, त्यांच्या पक्षामध्ये सावळा गोंधळ आहे. एका उमेदवाराला एबी फॉर्म दिल्यानंतर त्याचा प्रचार चालू झाल्यानंतर दुसरा उमेदवार अर्ज भरतो. त्याला एबी फॉर्म दिला जातो. यावरून त्यांच्या पक्षांमध्ये असलेली गोंधळाची परिस्थिती समोर आली आहे. त्यांना जिंकण्याचा विश्वास नाही, आमच्याकडे जिंकण्याचा विश्वास आहे. श्रीकांत शिंदे यांनी गेली दहा वर्षे कल्याण लोकसभेत केलेले जे काम आहे ते लोकांसमोर आहे.

खरी शिवसेना ही मोदींबरोबर आहे. हे पंतप्रधान मोदी खरं म्हणाले. कारण बाळासाहेबांचे विचार आमच्याबरोबर आहेत. धनुष्यबाण आमच्याबरोबर आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, ती खरी शिवसेना होऊच शकत नाही. त्यांना शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार नको. त्यांना धनुष्यबाण नको आहे. त्यांना फक्त आणि फक्त पैसे पाहिजे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेच्या खात्यातले जनतेचे पैसे म्हणजे शिवसेनेचे 50 कोटी देखील काढून घेतले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने