Vasant More : तुम्हाला फक्त धंगेकरच दिसतात का? वंसत मोरे यांनी केला संताप व्यक्त

 

ब्युरो टीम : पुणे पोर्श अपघात प्रकरणी फक्त काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांच्यावरच मीडिया फोकस करत असल्याने वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पुणे लोकसभेतील उमेदवार वसंत मोरे चांगलेच संतापले आहेत. तुम्हाला फक्त धंगेकरच दिसतात का? भरपूर ठिकाणी तुम्हाला धंगेकर दिसत आहेत. जो विषय चालला त्याबद्दल विचारा. आम्ही या घटनेचा निषेध केला. पहिल्यांदा आम्हीच आवाज उठवला. मीडियाला फक्त धंगेकरच दिसतात, असं म्हणत वसंत मोरे यांनी आपला संताप व्यक्त केला.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या हातून डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांचा फोटो फाडला गेला. त्यामुळे वसंत मोरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. वसंत मोरे यांच्या नेतृत्वात आज पुण्यात वंचित बहुजन आघाडीने जोरदार आंदोलन करत जितेंद्र आव्हाड यांचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेची मागणीही केली. जितेंद्र आव्हाड यांना मनोविकार तज्ज्ञाला दाखवा. मग शांत होईल. त्यांना मानसोपचाराची गरज आहे, असा हल्लाच वसंत मोरे यांनी चढवला.

चुका करतात आणि माफी मागतात

जितेंद्र आव्हाड हे राज्यातील शांतता बिघडवण्याचं काम करत आहेत. जोपर्यंत त्यांच्यावर कारवाई होत नाही, तोपर्यंत आव्हाड सुधारणार नाहीत. दरवेळी चुका करतात आणि माफी मागतात. जितेंद्र आव्हाडांनी काही पहिल्यांदाच माफी मागितली नाही. त्यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला आहे. त्याचे काय परिणाम होणार हे त्यांना महाराष्ट्रात फिरताना जाणवणार आहे, असं वसंत मोरे म्हणाले.

मनातून मनुस्मृती काढा

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली आहे. आव्हाडांचं आंदोलन हा शरीरातून मनुस्मृती घालावण्याचा प्रकार आहे. मनातून मनुस्मृती गेली का? मनातून जोपर्यंत मनुस्मृती जात नाही, तोपर्यंत आपण कृती करताना ती डोळस राहत नाही, अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. आव्हाडांनी धर्मवादी, निरपेक्षवादी, धर्मवादी आहे. असा ढिंढोरा पिटला तरी आधी त्यांनी मनातून मनुस्मृती काढावी, असा सल्लाही आंबेडकरांनी आव्हाडांना दिला आहे.

नियम शिथिल करा

पुण्याच्या प्रकरणात कुठल्यातरी मंत्र्याने फोन केल्याचं आंबेडकर म्हणाले. अग्रवाल नावाच्या बिल्डरची भागीदारी कुठल्या-कुठल्या राजकीय पक्षांसोबत आहे, कुठल्या राजकीय मंत्र्यांसोबत आहे किंवा कुठल्या राजकीय मंत्र्यांचे पैसे अडकलेले आहेत, याची चौकशी करावी आणि चौकशी करून कोणी फोन केला हे पोलिसांना विचारावं, असा सल्ला आंबेडकरांनी दिला आहे. दुसरं म्हणजे अपघात वाढत चालले आहेत. त्यामुळे अल्पवयीन आहे म्हणून त्याला कमी शिक्षा हा नवीन नियम आला आहे. हा नियम शिथिल करायला हवा. 18 वर्षा खालील मुलांना बार किंवा पबमध्ये प्रवेश दिला जाऊ नये, त्यांना प्रवेश देणाऱ्या मालकाला 3 वर्षाची शिक्षा करावी, त्याचा परवाना रद्द करावा आणि दहा लाख रुपये दंड करावा, अशी तरतूद परवण्यामध्येच करावी असा सल्ला आंबेडकरांनी दिला आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने