Devendra Fadanvis : नव्याने पेरणी करण्याची वेळ म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राजीनामा देण्यामागचा उद्देश

 

ब्युरो टीम : लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात अपेक्षित यश आलं नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारून उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. फडणवीस यांनी थेट पत्रकार परिषदेतच मंत्रीपदावरून मोकळं करण्याची इच्छा बोलून दाखवली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या भूमिकेमागच्या विविध थिअऱ्या व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय का व्यक्त केला, याचा खुलासाच फडणवीस यांनी केला आहे.

भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी हा खुलासा केला. यशाचे बाप अनेक असतात, पण अपयश ताकदीने अंगावर घ्यायचं असतं. ते पचवायचं असतं आणि नवीन निर्धार करायचा असतो. भाजपचं नेतृत्व मी करत होतो. म्हणून अपयशाची जबाबदारी माझी आहे हे मी सांगितलं. तुम्ही सर्वांनी उत्तम काम केलं. केवळ पॉलिटिकल अर्थमॅटिकमध्ये आपण कमी पडलो. कसं पडलो हे मी सांगितलंच आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस पळणारा नाही

मला मोकळं करून काम करण्याची संधी द्या, असं मी म्हटलं तेव्हा निराशेतून म्हटलं नव्हतं. देवेंद्र फडणवीस हा पळणारा व्यक्ती नाही. आम्ही लढणारे आहोत. चारही बाजूने घेरल्यानंतर पुरंदरचा तह करणारे आणि नंतर किल्ले जिंकणारे छत्रपती शिवाजी महाराज ही आमची प्रेरणा आहे. कुणाला वाटलं असेल मी निराश झालो किंवा भावनेच्याभरात राजीनाम्याचं बोललो असं नाही. माझ्या डोक्यात काही स्ट्रॅटेजी होती. त्यावर मला काम करायचं होतं. अमित शाह यांना मी भेटलो. त्यांनाही मी माझ्या डोक्यात काय हे सांगितलं. पण सध्या ही वेळ नसल्याचं अमित शाह म्हणाले. आपण नंतर एकत्र बसून महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट तयार करू असं शाह म्हणाले, अशी माहिती देतानाच निवडणुकीचा निकाल लागताच मी दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलोय. एक मिनिटंही मी शांत बसणार नाही. आता मी काम करत आहे. करणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नव्याने पेरणी करण्याची वेळ

मोदींच्या यशात 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. यावेळी तो वाटा उचलू शकलो नाही. या निवडणुकीत काही गणितं चुकली. त्यामुळेच नव्याने पुनरावलोकन व्हावं आणि नवीन स्ट्रॅटेजी यावी म्हणून बैठक घेतली. आपण निर्धार केलाय जे अपेक्षित यश आलं नाही, त्याची कारणं शोधून ती दूर करता येतील आणि विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचं सरकार कसं आणता येईल हा निर्धार व्यक्त केला आहे. उन्हाळा संपतो, काहीली संपलीय. आता पाऊस पडत असताना जे पेरलं जातं तेच उगवतं. आता नव्याने पेरण्याची वेळ आली आहे, असं फडणवीस म्हणाले.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने