pankaja Munde : निवडणुकीनंतर 'या' जिल्ह्यात महायुतीत पडला मिठाचा खडा ; भाजप जिल्हाध्यक्षाने केली पंकजा मुंडेना तिकीट देण्याची मागणी

 

ब्युरो टीम : नगरमध्ये महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप असताना, भाजपच्या पंकजा मुंडे यांना तिकीट देण्याची मागणी भाजप पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये अंतर्गत कुरघोडी सुरू झाल्या आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीनंतर नगर जिल्ह्यामध्ये अनेक राजकीय उलथापालथ होणार, हे निश्चित झाले होते. विखे यांचा दारुण पराभव झाल्यानंतर नगरचे समीकरण बदलणार व त्यामध्ये आता स्थानिक पातळीवर सुद्धा निवडणुका होणार आहेत. तेथे सुद्धा महाविकास आघाडीने एकत्रितपणे निवडणुका लढवण्याचा निश्चय जाहीर केलेला असतानाच दुसरीकडे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चलबिचल व कुरघोडी सुरू झालेल्या आहेत.  गेल्या दोन टर्मपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप हे नगर शहरांमध्ये निवडून आलेले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजप व अजित पवार गट हे एकत्रितरित्या विखे पाटलांच्या प्रचारामध्ये सामील झालेले होते. महायुतीचहा पदाधिकाऱ्यांना विखे यांना निवडून आणण्यात यश आले नाही. नगर शहर मतदारसंघांमध्ये मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सुजय विखे यांना निवडून आणण्यासाठी दिवंगत शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अनिल राठोड यांनी मोठे मताधिक्य या नगर शहरांमध्ये त्यांना दिले. ५४ हजाराचा लीड या नगर शहरातून त्यांना देण्यात आला. यंदा मात्र विखे यांना नगर शहरात अवघे ३१ हजार मतांचा लीड मिळालेला आहे. म्हणजेच याचा अर्थ विखे यांचे मताधिक्य हे नगर शहरांमध्ये कमी झाले. हे मताधिक्य कमी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी याच बरोबरीने काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वांनी एक दिलाने काम केल्यामुळे त्याचा फटका विखे यांना बसला. आता नगर शहरांमध्ये ३१ हजार लीड असल्याने महायुतीमध्ये कुरघोडी सुरू झाली आहे. निकाल लागून अवघे दोन दिवस झाल्यानंतर भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष आगरकर यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना पत्र देऊन पंकजा मुंडे यांना नगर या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी द्यावी, अशी जाहीर मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे त्यांना हे पत्र देताना महायुतीचे घटक पक्षाचे आमदार येथे नेतृत्व करतात, याचा विसर पडला असावा, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झाली आहे. त्यामुळे इतक्या घाईने पत्र देण्याचे कारण काय? अशी सुद्धा चर्चा भाजपामध्ये सुरू झाली आहे. एकंदरीतच निकालानंतर आता भाजपमध्येच नैराश्याचे वातावरण दिसून आलेले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने