World Blood Donor Day : जागतिक रक्तदाता दिन विशेष

 


ब्युरो टीम : रक्तदान एक महान कार्य समजले जाते. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचवले जाऊ शकते. रक्तदानाचे खरे महत्त्व हे तेव्हा कळते, जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा जीवन आणि मृत्यू यांच्यात संघर्ष करत असते . रक्तदान केल्याने एकीकडे आपण कोणाचेतरी प्राण वाचवतो तर दुसरीकडे आपल्याला प्रचंड आत्म-समाधानही मिळते. रक्तदानाबाबत असलेल्या अनेक गैरसमजांमुळे अनेक लोक रक्तदान करण्यास टाळाटाळ करतात, मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या माहितीनुसार यामुळे कोणतेही नुकसान होत नाही, तसेच त्याचे अनेक फायदेही आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे. दरवर्षी 14 जून रोजी जागतिक रक्तदाता दिन जगभरात साजरा केला जातो.हा दिवस साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे इतर लोकांना रक्तदानाबद्दल जागरुक करणे, जेणेकरून अधिकाधिक लोक हे कार्य करण्यासाठी पुढे येतील. रक्तदान का महत्त्वाचे आहे ते डॉक्टरांकडून जाणून घेऊया.

ती मानवतेची सर्वात मोठी सेवा..!
रक्तदान करून एखाद्याचे प्राण वाचवता येत असतील तर ती मानवतेची सर्वात मोठी सेवा आहे, असे अनेकदा म्हटले जाते. मानवी रक्तावर आत्तापर्यंत झालेल्या सर्व संशोधनांमध्ये कोणताही पर्याय सापडलेला नाही. जेव्हा गरज असते तेव्हा माणसाला नेहमी मानवी रक्ताची गरज असते. ट्रॉमा पेशंट असो, सर्जिकल पेशंट असो किंवा गंभीर ॲनिमियाने ग्रस्त असो, त्याला रक्ताची गरज असते. रुग्णाला गरजेनुसार रक्त दिले जाते. जागतिक रक्तदाता दिनानिमित्त एका वृत्तसंस्थेनघेतलेल्या मुलाखतीनुसार नवी दिल्लीच्या डॉ. मोनिका महाजन यांनी यासंबंधित माहिती दिलीय. ज्यामध्े रक्तदान कोण करू शकते? त्यासंबंधी कोणकोणते समज-गैरसमज आहेत? आवश्यक ती खबरदारी काय असावी? हे जाणून घ्या..

रक्तदान कोण करू शकतो?
जे लोक निरोगी आहेत, त्यांना कोणतीही गंभीर समस्या नाही आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे लोक नियमितपणे रक्तदान करू शकतात. डॉक्टर सांगतात, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, रक्त पातळ करणारे औषध घेणारे,ज्यांना कधी कावीळ झाला आहे,विशेषत: हिपॅटायटीस बी किंवा सी किंवा ॲनिमियाने ग्रस्त असलेल्यांनी रक्तदान करणे टाळावे.

समज-गैरसमज जाणून घ्या
साधारणपणे एक युनिट रक्त दान केल्यावर त्याचा शरीरावर विशेष परिणाम होत नाही किंवा अशक्तपणाही येत नाही. रक्ताचे एक युनिट (सुमारे 300-350 मिली) एका वेळी दिले जाऊ शकते. मानवी शरीरात इतकी क्षमता आहे की एक युनिट रक्त दान केले तर पुढील दोन-तीन दिवसांत शरीरातून त्याची भरपाई केली जाते. काही लोकांना संसर्गाची भीती वाटते, परंतु असे अजिबात नाही. आजकाल, रक्तदानात वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू डिस्पोजेबल असतात, त्यामुळे रक्तदानाच्या वेळी संसर्ग होण्याची शक्यता नसते.

रक्तदान करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा!
रक्तदान करण्यापूर्वी तुम्हाला हायड्रेटेड राहण्यास सांगितले जाते.
रिकाम्या पोटी रक्तदान करू नये.
रक्तदान केल्यानंतरही पुरेशा प्रमाणात द्रवपदार्थ आणि सकस आहार घेतला पाहिजे.
जर तुम्हाला थोडा अशक्तपणा वाटत असेल तर तुम्ही अर्धा तास विश्रांती घ्यावी.
सामान्यतः, रक्तदान केल्यानंतर लोकांना कोणतीही गंभीर लक्षणे किंवा धोका नसतो.

रक्ताचा कशा प्रकारे उपयोग होतो
लाल रक्तपेशी किंवा PRBC, प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट्स आणि प्लाझ्मा यासह एकाच रक्त पिशवीतून विविध प्रकारचे रक्त उत्पादने तयार केली जाऊ शकतात. रक्तातील कोणत्या घटकाची आवश्यकता आहे यावरते अवलंबून असते, दुर्मिळ रक्तगट असल्यास त्याच गटाच्या रक्तदात्याची व्यवस्था करावी लागते. मात्र, रक्तपेढ्यांमध्ये शक्यतो सर्व रक्तगटांचे रक्त उपलब्ध असते. त्याचप्रमाणे 'ओ' पॉझिटिव्ह (युनिव्हर्सल डोनर) रक्त कधीकधी प्लेटलेट कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी वापरले जाते.

आवश्यक खबरदारी घ्या..!
रक्तदान करण्यापूर्वी रक्तदात्याला आणि रुग्णाच्या हिपॅटायटीस, एचआयव्ही आणि मलेरियासारख्या आवश्यक चाचण्या केल्या जातात. रक्ताच्या नमुन्यात कोणताही आजार पॉझिटिव्ह आढळल्यास, रक्तपेढी संपूर्ण गोपनीयता पाळत रक्तदात्याला कळवते. ही माहिती इतर कोणाशीही शेअर केली जात नाही. जर कोणताही आजार असल्याचे समजले तर निदान आणि उपचारांमध्ये मदत केली जाते.

रक्तदानात किती अंतर असावे?
रक्तदान केल्यानंतर, एक महिन्यानंतर पुन्हा रक्तदान करता येते, परंतु तीन महिन्यांच्या अंतराने रक्तदान करण्याची सूचना केली जाते. पूर्व तपासणीमुळे रक्तदात्याला कोणतीही अडचण येत नाही. कोणतीही समस्या किंवा लक्षणे दिसली तरी रक्त नाकारले जाते. लक्षात ठेवा, व्यावसायिक रक्तदाता टाळा, त्यांच्याकडून संसर्ग होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने