Sanjay Raut : राज्यात ठाकरे-२ सरकार येणार, संजय राऊतांचं मोठं विधान



ब्युरो टीम : 'महायुतीला लोकसभेचा सर्व्हेही अनुकूल नव्हता आणि विधानसभेचाही नाही. आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. कोणत्याही परिस्थितीत राज्यात ठाकरे-२ सरकार येणार, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार येणार, हे कोणीही थांबवू शकत नाही,' असा दावा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत सूचक भाष्य केलं आहे. राज्यात ठाकरे 2 सरकार येणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

'महायुतीच्या नेत्यांनी निवडणुकीच्या तोंडावर कितीही घोषणा करूद्या. मग कितीही योजना आणा, पैशांचा धुरळा उडवा, मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करा. पण निवडणुका तुम्हाला वेळेतच घ्याव्या लागतील,' असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 

'विधानसभेची निवडणूक घेण्याची त्यांची इच्छा नसली तरी त्यांना घ्यावी लागेल. निवडणूक आयोगाला उत्तर द्यावं लागेल. नोव्हेंबरमध्ये त्यांना विधानसभा अस्तित्वात आणावी लागेल. हरियाणा, झारखंड, जम्मू-कश्मीर आणि महाराष्ट्रातील निवडणुका त्यांना वेळेतच घ्याव्या लागतील. जसं घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे तसं निवडणुकींच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतील. मात्र, महाराष्ट्रातील जनता आणि विरोधी पक्ष जागृत आहे, आणि आमचंही लक्ष आहे. विधानसभेची निवडणूक वेळेवर व्हायलाच पाहिजे, कारण आम्हाला खोकेवाल्यांचं सरकार घालवायचं आहे,' असं संजय राऊत म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने