beed : बीड जिल्ह्याला बाल विवाह निर्मुलनासाठी प्रतिष्ठित ‘स्कॉच’ चा पुरस्कार प्रदान

 


ब्युरो टीम : बीड जिल्ह्याने बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबविल्याबद्दल स्कॉच या नामंकित संस्थेचा 'स्कॉच २०२४  राष्ट्रीय पुरस्कार'  बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना आज प्रदान करण्यात आला. 

विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार संस्था प्रदान करीत असते. श्रीमती दीपा मुधोळ मुंडे बीडच्या जिल्हाधिकारी पदावर असताना त्यांच्या मार्गदर्शनात बीड जिल्ह्यात बाल विवाह रोखण्यासाठी विविध पावले उचलण्यात आली. त्याचा सकारात्मक परिणाम झाला असून या काळात होणारे आणि होत असलेले बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले. याचीच पोच पावती म्हणून स्कॉच या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने या कामाची दखल घेत बीड जिल्ह्याची बाल विवाह निर्मुलनासाठी निवड केली होती. 

आज राजधानी नवी दिल्ली येथे ९९ व्या स्कॉच परिषदेनिमित्त इंडिया हॅबिटॅट सेंटरच्या सिल्वर ओक सभागृहामध्ये एका शानदार समारंभात त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. 

बालविवाह निर्मूलनासाठी बीड जिल्ह्याने राबविल्या अभिनव उपाययोजना : दीपा मुधोळ मुंडे

बीड जिल्ह्यात बाल विवाहाचे प्रमुख कारण म्हणजे उसतोड कामगाराची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच हुंडा प्रथा, बाल लिंग गुणोत्तर, गरिबी, जुन्या चाली रूढी या समस्या गंभीर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे बाल विवाह रोखणे तसेच जन जागृती करणे या बाबत बीड जिल्ह्यात तत्कालीन जिल्ह्याधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी विशेष मोहीम हाती घेतल्याचे त्यांनी सांगीतले.

जिल्ह्यात वर्ष २०२१ पासून विवाह निर्मूलन युनिसेफ, एस बी सी ३ चाईल्ड लाईन बोर्ड, बाल कल्याण समिती बीड, सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संस्था आणि प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ ची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाय योजना सुरु केल्या.

 बाल विवाह निर्मूलन या विषयावर जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत दर महा जिल्हा कृती दलाची बैठक आखली. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, पोलीस ठाणी व ग्रामपंचायत येथे दर्शनीय भागात चाईल्ड हेल्प लाईन १०९८ चा लोगो रंगविण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सर्व गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समित्या नव्याने स्थापना करण्यात आल्या. सर्व तालुक्यात तालुका बाल संरक्षण समित्या अद्यावत करण्यात आल्या. शिक्षक, केंद्र प्रमुख, अंगणवाडी सेविका आशा सेविका, अंगणवाडी पर्यवेक्षिका, व ग्रामसेवक असे एकूण ४ हजार ७५१ कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घेतल्या. किशोरवयीन मुलामुलींची बाल विवाह संदर्भात जनजागृतीचे कार्यक्रम आखले.

५१४ केंद्र प्रमुख व बाल रक्षक शिक्षक अंगणवाडी पर्यवेक्षिका व ग्राम सेवक, गट प्रवर्तक पोलीस कर्मचारी शिक्षण विभागाचे कर्मचारी यांची कार्यशाळा घेण्यात आली.

जिल्हा महिला व बाल विकास, युनिसेफ, एसबीसी ३ व युवा ग्राम विकास मंडळ केज यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील १२५ माध्यमिक व उच्च माध्यमिक जिल्हा परिषद शाळेतील ७ हजार ३१३ मुली व ६ हजार ५६२ मुले असे एकूण १३ हजार ८७५ यांचे जन जागृतीचे कार्यक्रम घेतले. त्यांच्या पालकांचे  'पालक संवेदना' कार्यक्रम राबवून बाल विवाहाबाबत जन जागृती केली.

सक्षम युवा शक्ती कार्यक्रमातर्गत बीड जिल्ह्यातील २१ महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी रायमोहा (शिरूर कासार) अमळनेर (पाटोदा) व कडा (आष्टी) या ठिकाणी बाल विवाह जन जागृती अनुषंगाने पथनाट्य खेळ व गाण्याचे माध्यमातून ५ हजार पेक्षा अधिक लोकापर्यंत संदेश पोहचविण्यात आला. १५ ऑगस्ट २०२३ रोजी ३ हजार ८०० मुलांची बीड जिल्ह्यात जनजागृती रॅली काढण्यात आली.

जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये दर सोमवारी बालविवाह निर्मुलन विषयी प्रतिज्ञा घेतली जाते. १५ ऑगस्ट व २ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ग्राम सभेत बाल विवाह मुक्त ग्रामपंचायत बाबत ठराव घेण्यात येत आहेत.

'बाल विवाह मुक्त बीड' मोहिमेमुळे जिल्ह्यात झालेले परिणाम

चाइल्ड हेल्पलाइन १०९८ या क्रमांकाचे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जन जागरण झाल्याने  एप्रिल ते सप्टेंबर २०२४ अखेर १८२ बाल विवाह थांबवून ३ प्रकरणात बाल विवाह प्रतिबंध कायद्यान्वये  गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

सन २०२२-२३ मध्ये १३२ , २०२३ -२४ मध्ये २५५ बाल विवाह थांबविण्यात प्रशासनाला यश आले आहे, अशी प्रतिक्रिया दीपा मुदळ मुंडे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केली. 

बाल विवाह करणे, लावणे, त्यास प्रोत्साहन देणे, बाल विवाहाची बोलणी करणे, मुलगी पाहणे, यादी करणे, साखरपुडा करणे, कुंकू टिळा करणे, हळदी कार्यक्रम करणे हा कायद्याने गुन्हाच आहे.

बाल विवाह लावल्यास गुन्हा कोणावर नोंदविला जातो

नवरा मुलगा, मुलाचे मुलीचे आई-वडील, मुलाचे मुलीचे मामा-मामी, आज्जी आजोबा, विवाह सोहळ्यास उपस्थिती इतर सर्व नातेवाईक, वन्हाडी मंडळी, मंगल कार्यालय वाले, मंडपवाले, आचारी, बाजेवले, फोटोग्राफर, भटजी, पाणी वाले, डीजेवाले, घोडेवाला, व लग्न लावण्यास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणारे सर्व व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, या सर्वांबाबत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती केल्यामुळेच बालविवाह थांबवण्यास यश आले. ज्यांचे बालविवाह थांबवले त्यांच्या चेहऱ्यावरचे हसू आणि भविष्यातील त्यांना भेडसावणाऱ्या समस्या थांबविण्यात प्रशासनाला अंशतः का होईना यश आले. आजच्या स्कॉच चा मिळालेला पुरस्कार केलेल्या कामाची पोचपावती आहे, याचा विशेष आनंद होत असल्याची प्रतिक्रिया दीपा मुधोळ मुंडे यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने