special Day Article :‘जनसंपर्क’ आकाश कवेत घेणारे क्षेत्र...

ब्युरो टीम : भारतात दरवर्षी २१ एप्रिल हा दिवस ‘राष्ट्रीय जनसंपर्क दिन’ म्हणून साजरा केला जातो. आज कोणतेच क्षेत्र जनसंपर्काच्या प्रभापासून दूर नाही त्यामुळेच जनसंपर्क हा आपल्या सर्वांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मात्र जनसंपर्क क्षेत्रात कार्यरत असणारी व्यक्ती ही नेहमीच पडद्या मागची भूमिका बजावते.  या क्षेत्राची व या कामाची थोडक्यात ओळख व्हावी म्हणून महावितरणचे जनसंपर्क अधिकारी व ‘पीआरएसआय’च्या मुंबई चॅप्टरचे सहसचिव विश्वजीत भोसले यांचा विशेष लेख 

राष्ट्रीय जनसंपर्क दिन हा ‘पहिल्या अखिल भारतीय जनसंपर्क परिषदेचे’ स्मरण करणारा दिवस आहे. हा दिवस जनसंपर्क व्यावसायिकांचे महत्त्व सांगणारा, जनमत घडवण्यात आणि विश्वास निर्माण करण्यात जनसंपर्काची भूमिका अधोरेखित करणारा दिवस आहे.   जनसंपर्क क्षेत्र हे लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवण्याचे कार्य करते, ज्यामुळे सरकारी धोरणे, योजनांची माहिती आणि सामाजिक विषयांचे प्रबोधन होते. यामुळे लोकांच्या विचारला योग्य दिशा मिळून कृतीला चालना मिळते. थोडक्यात शासन, संस्था आणि जनता यांना जोडणारा दुवा म्हणजे जनसंपर्क होय.

२१ एप्रिल १९६८ रोजी दिल्ली येथे झालेली पहिली अखिल भारतीय जनसंपर्क परिषद ही भारतातील व्यावसायिक जनसंपर्कांची सुरुवात मानली जाते.   म्हणूनच हा दिवस पब्लिक रिलेशन्स सोसायटी ऑफ इंडिया(पीआरएसआय), पीआरएसआय या शिखर संस्थेच्या देशभरातील शाखा व विविध शिक्षण संस्था यांच्याकडून साजरा केला जातो. भारतातील जनसंपर्क कार्य आणि व्यावसायिकांवर प्रकाशझोत टाकणे, जनसंपर्काची राष्ट्रीय विकासात भूमिका अधोरेखित करणे, या क्षेत्रातील बदलते प्रवाह जाणणे, नव्याने या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या युवकांना या क्षेत्राची ओळख करून देणे या उद्देशने हा दिवस साजरा केला जातो.   

जनसंपर्क क्षेत्र – उगम व विकास

जनसंपर्क (पब्लिक रिलेशन – पीआर) हा एक महत्त्वाचा व्यावसायिक स्वरूपाचा पण सामाजिक संवादाचा प्रकार आहे. याचा उगम 20व्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिका व युरोपमध्ये झाला. आय.व्ही. बेटर ली यांना या क्षेत्राचे जनक मानले जाते. त्यांनी जनमताला प्रभावीपणे आकार देण्याची कला म्हणून जनसंपर्कास विकसित केली. प्रारंभी, जनसंपर्काचे कार्य फक्त माध्यमांशी संवाद साधणे आणि संस्थांची चांगली प्रतिमा तयार करणे इतपत मर्यादित होते. परंतु काळानुसार याचा विस्तार झाला आणि तो आज बहुराष्ट्रीय ते स्थानिक कंपन्या, केंद्र व सर्व राज्यांचे सरकार, विविध स्वतंत्र संस्था, राजकारण, सामाजिक संस्था यांच्यासाठी अपरिहार्य झाला आहे.

भारतात जनसंपर्काचे महत्त्व स्वातंत्र्यानंतर अधिक वाढले. सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जनसंपर्काच्या क्षेत्रात ‘साईट’, ‘खेडा’ सारखे विविध उपक्रम राबवले. जनसंपर्काचे यश पाहता नंतर खाजगी कंपन्यांनीदेखील आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी व प्रतिमा निर्मितीसाठी जनसंपर्क अधिकाऱ्याची नेमणूक करण्यास सुरुवात केली. आजच्या डिजिटल युगात वाढत जाणारी मुद्रित व ईलेक्ट्रॉनिक माध्यमे,  सोशल मीडियाचा प्रभाव, ऑनलाइन न्यूज पोर्टल्स आणि इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून जनसंपर्क क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. पारदर्शकता, विश्वासार्हता, संवाद कौशल्य आणि रणनीतीपूर्वक मांडणी ही या क्षेत्रातील यशाची त्रिसूत्री आहे. आणि म्हणूनच जनसंपर्क हे प्रपोगंडा, जाहिरात यापासून वेगळे ठरते.

जनसंपर्क आणि संवाद यांचा सहसंबंध

जनसंपर्क (पब्लिक रिलेशन – पीआर) हा संस्था व जनतेमध्ये विश्वास, समजूत आणि सहकार्य निर्माण करणारी एक संवाद प्रक्रिया आहे. त्यामुळे संवाद समजून घेताना त्याचे मुलभूत घटक समजून घेणेही  महत्वाचे ठरते. जनसंपर्काच्या माध्यमातून नवीन विषय समजावून सांगताना कोण? काय? कधी? कसे? केंव्हा? कोठे? या प्रश्नांची खरी व पारदर्शकपणे उत्तरे द्यावी लागतात तरच तो खरा जनसंपर्क ठरतो. तसेच जनसंपर्कात जे सांगितले जाते तेच व तसेच लोकांपर्यंत पोहचते काय व त्याचा अपेक्षित परिणाम साधला जातो काय हे पाहणे महत्वाचे ठरते. परिणाम साधला जात नसेल तर संवादात येणारे अडथळे लक्षात घेत संवाद साधनांत व प्रर्क्रियेत अनुरूप बदल करावा लागतो. थोडक्यात प्रभावी संवाद हा यशस्वी जनसंपर्काची गुरुकिल्ली आहे. 

प्रभावी जनसंपर्क साधण्याची माध्यमे

प्रभावी जनसंपर्क साधण्यासाठी पारंपरिक व आधुनिक अशा दोन्ही प्रकारची साधने महत्त्वाची भूमिका बजावतात. सर्वप्रथम, प्रेस रिलीज हे माध्यम संस्थेच्या बातम्या, उपक्रम, किंवा नविन घडामोडी माध्यमांपर्यंत पोहोचवण्यासाठी उपयोगी ठरते. प्रेस कॉन्फरन्स किंवा पत्रकार परिषदेद्वारे थेट संवाद साधता येतो, ज्यामुळे अधिक स्पष्ट व सखोल माहिती दिली जाते. इलेक्ट्रॉनिक मीडिया (टीव्ही, रेडिओ) हे जनतेपर्यंत तात्काळ पोहोचण्यासाठी प्रभावी ठरते. आज सोशल मीडिया हे सर्वात वेगवान व प्रभावी माध्यम म्हणून उदयास आले आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, लिंक्डइन, यु ट्यूब  यांसारख्या अनेक प्लॅटफॉर्मवरून थेट जनतेशी संवाद साधता येतो. या व्यतिरिक्त, खाजगी क्षेत्रातील संस्थांकडून ई-मेल मार्केटिंग, ब्लॉग लेखन, वेबिनार्स आणि पॉडकास्ट्स यांचाही वापर वाढत चालला आहे.

जनसंपर्क क्षेत्राचे महत्व

जनसंपर्क क्षेत्र हे शासनाच्या कल्याणकारी राज्यासोबातच, विविध संस्था, उद्योग, किंवा व्यक्तीच्या यशामध्ये मोलाची भूमिका बजावते. एखाद्या संस्थेची प्रतिमा घडवणे, तिच्या उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे आणि संकटाच्या वेळी योग्य माहितीचा प्रसार करणे हे जनसंपर्काचे मुख्य उद्दिष्ट असते. राजकारण, व्यवसाय, शिक्षण, आरोग्य अशा प्रत्येक क्षेत्रात जनसंपर्क अत्यंत आवश्यक ठरतो आहे. वाढती व्यावसाईक स्पर्धा ही जनसंपर्क क्षेत्राच्या उगमापासून पोषक ठरत आली आहे. चांगला जनसंपर्क अधिकाधिक लोकांना जोडतो आणि सकारात्मक प्रतिमा निर्माण करतो. बदलत्या तंत्रज्ञाना सोबत अपडेट राहत असतो. 

आज केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व खाजगी क्षेत्र हे जण संपर्काचा प्रभावी वापर करत असून या तिघांचे जनसंपर्काचे दृष्टिकोन, साधने व कार्यपद्धती वेगवेगळी आहे. शासन हे व्यापक लोकहितासाठी जनसंपर्क करते. केंद्र शासन हे राष्ट्रीय पातळीवर काम करत असल्याने त्यांचे जनसंपर्क धोरण अधिक व्यापक असते. त्यात डिजिटल मीडिया, प्रसारमाध्यमे, तसेच अधिकृत प्रवक्ते यांचा समावेश होतो. धोरणात्मक निर्णय व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर केला जातो. राज्य शासन हे राज्यस्तरीय असल्याने जनसंपर्क अधिक राज्य व स्थानिक पातळीवर केंद्रित असतो. यामध्ये भाषिक व सांस्कृतिक घटक अधिक प्रभावी ठरतात. याउलट खाजगी क्षेत्रातील जनसंपर्क अत्यंत आधुनिक, जलद व ग्राहककेंद्रित धोरणांचा वापर करते. सोशल मिडिया, इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, ब्रँडिंग स्ट्रॅटेजीज यांचा जास्त प्रभावी वापर खाजगी क्षेत्रात केला जातो, कारण आर्थिक वृद्धी व व्यावसायिक स्पर्धा हा खाजगी क्षेत्राचा पाया आहे. 

पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया

‘पीआरएसआय’(स्थापना १९५८) ही भारतातील एक प्रमुख व्यावसायिक संस्था आहे जी जनसंपर्क या क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांना एकत्र आणते. ‘पीआरएसआय’ ही भारतीय संस्था कायदा, 1961 अंतर्गत नोंदणीकृत संस्था आहे. संस्थेचे मुख्य उद्दिष्ट जनसंपर्क व्यवसायाची व्यावसायिक प्रतिमा उंचावणे, नैतिक मूल्यांना प्रोत्साहन देणे आणि देशभरातील जनसंपर्क व्यावसायिकांमध्ये ज्ञान व अनुभवाचे आदानप्रदान घडवून आणणे हे आहे. ‘पीआरएसआय’ची भारतभरात विविध चॅप्टर्स आहेत, ज्या स्थानिक पातळीवर उपक्रम राबवतात. ‘पीआरएसआय’ कडून उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पुरस्कार आणि सन्मानही दिले जातात. सध्या डॉ. अजीत पाठक हे ‘पीआरएसआय’चे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘पीआरएसआय’ने जनसंपर्क क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. डॉ. पाठक हे  ‘आंतरराष्ट्रीय पब्लिक रिलेशन्स असोसिएशन’ (आयपीआरए) च्या गव्हर्निंग बॉडीमध्ये निवडले गेले आहे तसेच ‘ग्लोबल अलायन्स ऑफ पब्लिक रिलेशन्स अँड कम्युनिकेशन्स मॅनेजमेंट’चे सचिव म्हणूनही ते कार्यरत आहेत. 

जनसंपर्क क्षेत्रातील नवीन आव्हाने आणि संधी

सध्याच्या डिजिटल युगात डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि जनसंपर्क या क्षेत्रांनी एकत्र येत अनेक नव्या शक्यता निर्माण केल्या आहेत. व्यवसाय, प्रसारमाध्यमं, शासकीय संस्था तसेच वैयक्तिक ब्रँडसाठी या तिन्ही क्षेत्रांची महत्त्वाची भूमिका बनली आहे. जनसंपर्क क्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आता या क्षेत्रांची चांगली जाण असणे गरजेचे आहे. माहितीचे संकलन, विश्लेषण हे अधिक गतिमान व क्लिष्ट बनणारे आहे आणि अर्थातच याचा प्रभाव संवाद प्रक्रियेवर पडणार आहे. त्यामुळेच गोपनीयता, नैतिकता व कायदेशीर बाबी यांचा विचार करत जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीस अधिक सजगपणे व मानवी संवेदना जपत भूमिका पार पाडावी लागणार आहे. या सर्व बाबींचा व या क्षेत्राच्या वलयाचा विचार करता जनसंपर्क क्षेत्र हे आकाशाला कवेत घेणारे ठरेल असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने